
Nashik News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले तरी अजून नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. असे, असताना 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर निश्चित झाली आहे. राज्य सरकारच्या सामन्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीनुसार मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तेच नाशिकमध्ये ध्वजारोहण होणार आहे. त्यामुळे महाजन हेच जिल्ह्याचे अघोषित पालकमंत्री असल्याचे दिसून येत असून तशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या दादा भुसेंच्या पदरी निराशा पडल्याचं बोललं जात आहे.
परंतु यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेच व्हावेत, अशी वैयक्तिक इच्छा व्यक्त केली आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. प्रशासनाकडून प्रसिद्ध झालेली यादी पालकमंत्री पदाची यादी नाही तर फक्त प्रत्येक जिल्ह्यात 15 ऑगस्टला कोण कुठे ध्वजारोहण करणार या नावांची ती यादी आहे. मागच्यावेळेला देखील नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचे नाव ध्वजारोहणासाठी निश्चित करण्यात आले होते. याहीवेळेला त्यांचे नाव जाहीर झाले आहे. याचा अर्थ पालकमंत्री जाहीर झाल्याचे वाटून घेऊ नका असं सामंत यांनी म्हटलं आहे.
सामंत पुढे म्हणाले, आजही मी माझ्या मतावर ठाम आहे, की नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसेंचा तर रायगडमध्ये भरत गोगावले यांचा विचार पालकमंत्रीपदासाठी झाला पाहीजे. परंतु याचे सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेतात. मी मांडलेलं मत एक सहकारी म्हणून मला काय वाटतं ते आहे. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सर्व निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. शिंदे साहेब महायुतीच्या दोन्ही नेत्यांशी बोलून ते ठरवतील व ते जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल असं सामंत म्हणाले.
दरम्यान पालकमंत्रीपदाचं घोडं कुठे अडलं आहे असं विचारले असता ते म्हणाले, त्यावर कुठे अडलं आहे, हे प्रमुख तिघेच सांगू शकतात. मी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतल्यास बरं होईल. परंतु आमच्याबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकारी एकनाथ शिंदे साहेबांना असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला. ध्वजावंदन हे केलच पाहीजे, त्यादिवशी कुठलाही राजकीय विचार न ठेवता ते झालं पाहीजे ही भूमिका सरकारची आहे. त्यातून ध्वजारोहण कोण करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सामंत यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन केलेल्या या विधानामुळे काहीसा वाद शांत झाला असला तरी तो किती काळ शांत राहिल हे पाहावे लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यात शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांसारख्या जेष्ठ मंत्र्यांना डावलून महाजनांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने भाजपने महाजन हेच पालकमंत्री असतील असे संकेत यातून दिले आहेत असे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शह-काटशहच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.