

Maharashtra education policy : आमदार सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळात शिक्षकांसाठी असलेल्या TET सक्तीवर जोरदार आक्षेप घेतला. ही परीक्षा म्हणजे, अनुभवी शिक्षकांवर अन्याय आहे.
20-30 वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना शेवटच्या टप्प्यात परीक्षा देण्याच्या सक्तीने असंतोष निर्माण झाला आहे. तसंच शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेची गरजही आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणा, भ्रष्टाचार, शिक्षकांवरील अन्याय आणि धोरणात्मक अस्पष्टतांवरून विधिमंडळात लक्ष वेधले. ते म्हणाले, "राज्यातील शिक्षण व्यवस्था सध्या, अत्यंत गंभीर आणि अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. विशेषतः शालेय शिक्षण विभागातील प्रशासनिक ढिसाळपणा आणि भ्रष्टाचार संपूर्ण यंत्रणा कमकुवत करताना दिसत आहे."
शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या TETच्या सक्तीवर आमदार तांबेंचा आवाज सभागृहात चांगलाच घुमला. ते म्हणाले, "अनुभवी शिक्षकांसाठी TET सक्ती अन्यायकारक आहे. 20-30 वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना शेवटच्या टप्प्यात परीक्षा देण्याची सक्ती केल्याने असंतोष निर्माण झाला आहे. अनुभव लक्षात घेऊन परीक्षा सुलभ केल्यास शिक्षकांना न्याय मिळू शकतो व व्यवस्थेत स्थैर्य राहील."
'शिक्षकांना TET लागू आहे की नाही, याबाबत स्पष्ट धोरण नाही. भरती व पदोन्नती प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला आहे. म्हणूनच शिक्षकांच्या न्यायासाठी राज्याने ठोस भूमिका घेऊन कायदेशीर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसंच शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराच्या तक्रारी समोर येत असून यामुळे विभागाची प्रतिमा मलिन होत आहे. प्रामाणिक शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांचे यात नुकसान होत आहे,' याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं.
SIT चौकशीच्या नावाखाली मान्यता, वेतन व पदोन्नतीची अनेक प्रकरणे प्रलंबित राहून प्रशासकीय कामकाज ठप्प होत आहे. अशा चौकशांच्या माध्यमातून प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होत असून नियम पाळणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनाच विलंब, अडथळे आणि संशयाच्या वातावरणात काम करावे लागत आहे. यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे, अशी मागणी सत्यजीत तांबे यांनी केली.
शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेची मोठी गरज व्यक्त करत, पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक सन्मानावर आधारित सुधारणा केल्यास शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास पुनर्स्थापित होईल. राज्यातील शिक्षकांमधील असंतोष दूर करण्यासाठी प्रशासन योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी. ती पूर्ण होईपर्यंत शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी, सरकारकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचा निर्धार देखील सत्यजीत तांबे यांनी विधिमंडळाच्या सभागृहात बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.