

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचे मंत्री व संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांनी शंभर प्लसचा नारा दिला होता. त्यासाठी पक्षातील स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश दिले. अनेक निष्ठावंतांना डावलून महापालिका निवडणुकीत या सगळ्या आयारामांना उमेदवारीही दिली गेली. त्यामुळे उमेदवारी डावलल्या गेलेल्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक नाशिकमध्ये पाहायला मिळाला. यामुळे अखेर वरीष्ठ नेतृत्वाने पळवला गेलेल्या ए बी फॉर्मवरून भाजप उमेदवारी मिळवलेल्या हर्षा बडगुजर यांना माघार घेण्यास सांगितले. यामुळे भाजपचे संकटमोचकच संकटात सापडल्याची चर्चा आहे.
भाजपमध्ये उमेदवारीवरुन निर्माण झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी हे बंड पूर्णपणे शमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करुनही त्यांना पूर्ण यश आलेले नाही. कारण अनेक बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. काहींनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली तर काहींनी अन्य पक्षात प्रवेश करुन उमेदवारी केली आहे. या सगळ्या बंडखोरांचा फटका भाजपच्या अधिकृत उमेदवारांना बसणार असल्याचे मानले जात आहे.
भाजपने तिकीट वाटपात निष्ठावंताच्या तुलनेत पक्षातील आयारामांना अधिक महत्व दिले. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरतानाही व एबी फॉर्म वाटपाच्या वेळी बराच गोंधळ पाहायला मिळाला होता. नाशिक महापालिका निवडणुकीचे प्रभारी व मंत्री गिरीश महाजन यांनी त्यावेळी म्हटलं होतं की, पक्षात मोठ्या आशनं आलेल्या आणि त्यांच्याबाबत काही कमिटमेंट ठरलेल्या असल्याने त्यांना तिकीट द्यावे लागतील. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही, गोंधळ घालणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची चौकशी केली जाईल अशी तंबीच गिरीश महाजन यांनी दिली होती.
पक्षात होत असलेल्या आयारामांच्या प्रवेशाला स्थानिक आमदारांचाही विरोध होता. पण स्थानिक आमदारांचा विरोध झुगारुन त्यांना प्रवेश दिले गेले. सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश आमदार सीमा हिरे यांचा विरोध डावलून महाजन यांनीच घडवून आणला होता. एकीकडे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात असताना गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने भाजपत दाखल झालेल्या बडगुजर यांना मात्र चार एबी फॉर्म मिळाले होते. त्यांच्या घरात तब्बल तीन जणांना तिकीट देण्यात आली होती. त्याला आमदार सीमा हिरे यांनी पुन्हा कडाडून विरोध केला. बडगुजर यांच्या एकाच घरात इतके एबी फॉर्म दिले गेले. यामागे कोण आहे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत केली. अप्रत्यक्षपणे त्यांनी गिरीश महाजन यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जाते.
तसेच शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या अहवालातही म्हटलं होतं की, एबी फॉर्मच्यावेळी उडालेल्या गोंधळामुळे चार एबी फॉर्म बडगुजर यांच्याकडे गेले असावे. परंतु एबी फॉर्मचा उडालेला गोंधळ सुनियोजित कटाचा भाग असावा अशी चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली. संशयाची सुई मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेली. त्यातूनच ही तक्रार पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचली व पक्षश्रेष्ठींनी अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळालेल्या सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांना माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या जागी माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांना पक्षाने पुरस्कृत केले आहे.
हर्षा बडगुजर यांना माघार घ्यावी लागणे म्हणजे गिरीश महाजन यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नाशिकच्या मैदानात पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयाने महाजनांच्या प्राबल्याला कुठे तरी धक्का बसल्याचे बोलले जात असून संकटमोचकासमोर नवीन संकट उभे राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.