Nashik Earthquake : नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ भूकंपाचे चार धक्के बसले, धक्के सौम्य स्वरुपाचे असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. दरम्यान, खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव व परिसरात आज सकाळी 9.55 वाजल्यापासून भूकंपाचे ४ सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 नोंदवली गेली आहे. एकापाठोपाठ एक असे चार वेळा जमिनीला हादरे बसले. त्यामुळे बोरगाव परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक घाबरुन घराबाहेर पडले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कुठलेही नुकसान झालेले नाही. फक्त आवाज झाले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तहसीलदार पाहणी करुन सविस्तर अहवाल पाठविणार आहे. नागरिकांनी अजिबात न घाबरता सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी कासा या परिसरात आज सकाळी १० वाजून 57 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा हादरा जाणवला असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. या हादऱ्याची तीव्रता 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.
2018 पासून पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक कमी जास्त तीव्रतेचे भूकंपाचे हादरे या परिसरात बसले आहेत. या धक्क्यांमुळे जीवितहानी झाली नसली तरी ग्रामीण भागातील लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.
नाशिकमध्ये गोदावरीचे रौद्ररुप
दरम्यान, नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. गंगापूर धरणातून विसर्ग सुरु असल्याने गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केलं आहे. चांदोरी, सायखेडा येथील साडे सहाशे कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आलं आहे. गोदावरीच्या वेगवान प्रवाहामुळे दिवसभर निसर्गाचे भयावह रुप नागरिक अनुभवत आहे.
गंगापूर, कश्यपी व गौतमी गोदावरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, आज दिनांक 25.7.2026 रोजी सकाळी 8 वाजता गंगापूर धरण विसर्ग 4310 cusecs ने कमी करून गोदावरी नदीत 8370 cusecs ने विसर्ग सोडण्यात आला आहे.
आज दिनांक 25.7.2026 रोजी सकाळी 8 वा वाजता कश्यपी धरण विसर्ग 500 cusecs गोदावरी नदीत 500 cusecs ने विसर्ग सोडण्यात आला आहे. आज दिनांक 25.7.2026 रोजी सकाळी 8 वाजता गौतमी गोदावरी धरण विसर्ग 500 cusecs ने वाढ करून गोदावरी नदीत 1500 cusecs ने विसर्ग सोडण्यात आला आहे. अशा प्रकारे टप्या टप्या ने विसर्ग वाढवण्यात येईल, याची सर्वांनी काळजीपूर्वक नोंद घ्यावी असे नाशिक जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.