
Mumbai News : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेच्या निकालावरून चांगलेच गालबोट लागले.
पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीच्या निकालावरून राज्यात चांगलाच वाद उद्भवला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या स्पर्धेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "अहिल्यानगरमध्ये ज्या संघटनेने कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते, ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ तीन वर्षांपूर्वी स्थापन झाला आहे. अन् गेल्या 70-80 वर्षांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद या क्षेत्रामध्ये काम करत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करत आहे". पण परवा ज्या संघाने अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली, ती पैलवानांसाठी होती की, नेत्यांसाठी हेच कळलं नाही. तिथं तज्ञ कमी, पंच कमी अन् नेते जास्त होते, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कुस्तीगीर संघाने कुठल्यातरी पैलवानाला जिंकवण्यासाठी ही स्पर्धा केली होती का, अशी शंका देखील रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात पूर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरींचा तिथं कुठेही मानसन्मान दिसला नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने, कुठलाही नियम नसलेल्या या स्पर्धेला काहीच अर्थ राहत नाही. स्पर्धेचा निकाल बघितल्यावर, जो काही आहे, त्यात देखील अन्याय झालेला आहे, असं वाटतं. त्यामुळे हे सगळं जे काही चाललं आहे, ते योग्य वाटत नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून जी 70 वर्ष जुनी संघटना आहे, तिच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये घ्यावी. कुठल्याही पैलवानाला जिंकण्यासाठी आम्ही महाराष्ट्र केसरी घेणार नाही. पण शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पैलवानांना खऱ्या अर्थाने निष्पक्षपणे व्यासपीठ देवू, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या स्वागताध्यक्षतेखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती घेतली होती. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात या स्पर्धेच्या निकालावरून चांगलाच गोंधळ झाला. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि उपांत्य फेरीतील शिवराज राक्षे यांना पंचांची गैरवर्तन केले म्हणून तीन वर्षांसाठी निलंबन केले आहे. शिवराज राक्षे यांनी स्पर्धेच्या निकालावरून न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ही स्पर्धा वादात येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.