Raju Shetty News: किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यंदा ३ लाख टन कांद्याची खरेदी केली. सध्या बाजारात कांदा दर घसरले आहेत. अशातच नाफेडकडून बफर स्टॉकचा कांदा बाजारात विक्रीला आणल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
कांदा प्रश्नावर गेल्या महिन्यात देशातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेच्या आवारात आंदोलन केले होते. खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांसह नाशिकत्या भास्करराव भगरे, राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव यांनी कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र केंद्र शासनाने पुन्हा एकदा कांदा उत्पादकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.
नाशिक ही कांद्याची राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ आणि उत्पादकांचा प्रदेश आहे. कांदा प्रश्नावर गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. आता नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही केंद्रीय संस्थांनी कांदा बाजारात आणला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादन घेतलेले असताना सध्या बाजारात कांद्याला अपेक्षित दर नाही. किरकोळ विक्रीत कांदा दरवाढीची कोणतिही ओरड नसताना ’बफर स्टॉक’चा कांदा बाजारात आणण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद शहरात २४ रुपये प्रति किलो दराने विक्रीला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातून ३ लाख टन रब्बी कांद्याची खरेदी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून केली. या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या कांदा खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. अशातच केंद्रीय ग्राहक व्यवहार सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत २४ रूपये दराने किरकोळ विक्रीला सुरुवात झाली आहे.
यावर कांदा उत्पादक संतप्त आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले. सरकार कांदा उत्पादकांना व्यापाऱ्यांपेक्षा वाईट वागणूक देत आहे. एका बाजूला शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायचा, त्याचे अद्याप पैसे दिलेले नाहीत. दुसरीकडे तोच कांदा बाजारात कुठलीही दरवाढ नसताना हा कांदा बाजारात ओतायचा हे सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे.
नाफेडने १४ ते १६ रुपये प्रती किलो दराने कांदा खरेदी केली. दोन महिन्यात हा कांदा २४ रुपये दराने विक्री करीत आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की नफा कामासाठी हेच कळेना झाले आहे. सरकारने आता ही दलाली बंद करावी. विक्री करायची असेल तर खरेदी केलेल्या कांद्याची किंमत, हाताळणी व वाहतूक खर्च यातून उरणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी प्रतिक्रिया माजी खासदार शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.