
Pankaja Munde : विधिमंडळात रमी खेळल्यावरुन वादात सापडलेल्या अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. तर यापूर्वीचे कृषीमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन वादाच्या भोवऱ्यात सापडल्यावरुन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, त्यांनी यासंदर्भात बोलणं टाळलं. 'मी फक्त माझ्या खात्याकडेच बघते' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित 'एअरोनॉमिक्स २०२५' या मोहिमेच्या उद्घाटनासाठी पंकजा मुंडे नाशिकमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मंत्री पंकजा मुंडे यांना कृषी खात्यात झाल्याल्या अदलाबदलीविषयी विचारणा केली. तसेच कृषीमंत्री सातत्याने वादात सापडत असल्याचे विचारले असता, असे विषय मी मांडत नाही असं त्या म्हणाल्या. तसेच मंत्री असल्यामुळे कुणी अडचणीत सापडतं असं मला वाटत नाही. त्यामुळे असे म्हणणे योग्य होणार नाही. मी त्याकडे बघतच नाही. मी फक्त माझ्या खात्याकडेच बघते असं उत्तर देत त्यांनी याविषयावर अधिक बोलणं टाळलं.
दरम्यान एअरोनॉमिक्स कार्यक्रमावेळी आयोजकांतर्फे मंत्री पंकजा मुंडे यांना नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर व्हावे, अशी विनंती करण्यात आली. मुंडे यांनी तोच धागा पकडत आपल्या भाषणात कोणत्या प्रकारची ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर होऊ असा प्रश्न आयोजकांना केला. आता मी राजकीय कपडे घातले आहेत. त्यामुळे हा पोशाख चालेल की आध्यात्मिक ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर झालेली आवडेल अशा शब्दात त्यांनी आयोजकांची फिरकी घेतली.
गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी लक्ष घालणार
पंकजा मुंडे म्हणाल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मला वेळोवेळी नाशिकमध्ये यावे लागणार आहे. गोदावरी नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यात मी स्वत:लक्ष घालणार आहे. राज्यातील नद्यांमध्ये सांडपाणी विनापरवाना सोडलं जातं. त्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भावी पिढ्यांच्या दृष्टीने हे गंभीर संकट आहे. या संकटाला रोखण्यासाठी प्रत्यकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुंबई पुण्याची अवस्था पाहता नाशिकचे नुकसान होणार नाही यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातच श्वासत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान नद्यांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच आराखडा सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि जलसंपदा विभागात समन्यव असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आला असून पुढील पंधरा वर्षांचे नियोजन करुन नदी पुनरुज्जीवनाला प्राधान्य देणार असल्याचं त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.