
Congress News : तीन पिढ्यांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकतेच कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या कुटुंबाचे कॉंग्रेससोबत पिढ्यानपिढ्या चांगले संबंध राहिले आहेत. कुणाल पाटील स्वत: राहुल गांधी यांचे चांगले निकटवर्तीय होते. तरीही त्यांनी भाजपची वाट का धरली हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. यासंदर्भात बातचीत करण्यासाठी त्यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस सोडण्याची काही कारणे सांगितली.
राहुल गांधी यांच्या कोअर टीम मध्ये जाण्याचे सौभाग्य कुणाल पाटील यांना मिळालं होतं. केंद्र व राज्य पातळीवर काम करायला मिळत होतं. राहुल गांधीच्या टीममधील युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. राज्यात कार्याध्यक्ष पद मिळालं होतं. असे असताना राहुल गांधी यांची साथ सोडावी असं का वाटलं? काय असं झालं की राहुल गांधी तुम्हाला आकर्षित करु शकले नाही किंवा धरुन ठेऊ शकले नाही..असा सवाल कुणाल पाटील यांना यावेळी करण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं..
ते म्हणाले, राहुल गांधी यांच्याकडे सर्वांचं चांगलं झालं पाहीजे, गोरगरिबांचं कल्याण झालं पाहीजे ही एक चांगली भावना त्यांच्या मनात आहे. भारत जोडो यात्रेत मी त्यांच्यासोबत पूर्ण वेळ फिरलो, एका जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे होती, त्यावेळेलाही मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे राहुल गांधी यांना सुद्धा वाटतं की चांगलं काहीतरी घडवण्याची आवश्यकता आहे.
परंतु कॉंग्रेसमध्ये पूर्वी जी एक पद्धत होती. एक थिंक टॅण्क असायचा, जो सर्व गोष्टींचं नियोजन करायचा. एक माणुस सर्व गोष्टी घडवू शकत नाही. त्याला एक टीम लागते, ती टीम राहुल गांधी निर्माण करु शकले नाही. आज माझ्यासारख्याला जर कुणी विचारलं की, कोणत्या नेतृत्वाकडे बघून तू कॉंग्रेसमध्ये राहशील तर राज्यात व केंद्रातही तसं नेतृत्व मला डोळ्यासमोर दिसत नाही. प्रत्येक गोष्ट थोडीच राहुल गांधीपर्यंत आपण घेऊन जावू शकतो. अशी कोणतीही टीम किंवा नेतृत्व कॉंग्रेसमध्ये आज मला डोळ्यासमोर दिसत नाही. दुर्दैवाने कॉंग्रेसमध्ये ती एक फार मोठी कमी निर्माण झालेली आहे असे पाटील म्हणाले.
कॉंग्रेसमध्ये नेतृत्व दिसलं नाही म्हणून तुम्ही भाजपमध्ये आलात मग भाजपमध्ये असं कोणतं नेतृत्व आहे ज्याच्या टीमचे तुम्ही भाग असाल असे विचारले असता, कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले.
ते म्हणाले, २०१४ मध्ये मी आमदार झालो त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. मी विरोधी पक्षाचा आमदार होतो. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मला आधीतर वाटायचं आपण मुख्यमंत्र्यांना कसं भेटावं. त्यात मी विरोधी पक्षाचा आमदार मग आपलं काम ते करतील का असं वाटायचं. पण मी एकदा दोनदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा संकोच मनात घेऊन गेलो, पण माझ्या लक्षात आलं की, हे नेतृत्व काही तरी वेगळं आहे, हे आपल्याला विरोधी पक्षातील समजतच नाही. अगदी मी जी काही कामे घेऊन गेलो ती तत्काळ त्यांनी मंजूर केली. मतदारसंघात चांगला निधी द्यायचा, भेदभाव करायचा नाही ही त्यांची भूमिका मला भावल्याचं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस साहेबांचे विकासाचे व्हिझन मोठे आहे. त्यांना इतरही मतदारसंघातील प्रश्नांबद्दल माहिती असते. त्यांनी धुळे आणि नरडाणा एमआयडीसीच्या बाबतीत जे व्हिझन मांडलं आहे. त्यावरुन खान्देशात जो विकासाचा अनुशेष राहुन गेला आहे तो भरुन काढण्याची आवश्यकता असल्याचं त्यांना जाणवतं. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रवाहात आडकाठी बनण्यापेक्षा त्यासोबत गेलेलं बरं असं पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.