

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजप पक्षश्रेष्ठींनी मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर टाकलेली आहे. कुंभमेळा मंत्री असलेले महाजन हे निवडणूक प्रभारी असून नाशिकमधील सर्व निर्णय तेच घेतात.
परंतु नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या एबी फॉर्म वाटपात मोठा गोंधळ उडाला होता. एबी फॉर्मसाठी कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग केला होता. तसेच भाजपच्या सुधाकर बडगुजर यांच्याकडे एकाचवेळी चार एबी फॉर्म देण्यात आले होते. काही ठिकाणी एकाच प्रभागात दोन-दोन अर्ज देण्यात आल्याने आपल्याच उमेदवारांना पुरस्कृत करण्याची वेळ भाजपवर आली. भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डेमसे आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.
नाशिकमध्ये भाजपमधील निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. पैसे घेऊन एबी फॉर्म वाटप केल्याचे आरोप झाले. एकाच व्यक्तीकडे चार-चार एबी फॉर्म कसे दिले गेले. यावर आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली व यामागे कोण आहे त्याची चौकशी करण्याची मागणी केली.
त्यानंतर या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष सुनिल केदार यांच्याकडून अहवाल मागवला. केदार यांनी चव्हाण यांना अहवाल पाठवला. त्यात सुधाकर बडगुजर यांना चार एबी फॉर्म दिले नाहीत तर व्हिलोळी येथील व्हिल्यात १०८ एबी फॉर्मचे वाटप झाल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे बडगुजर यांच्याकडे चार एबी फॉर्म गेले असावेत असे मत सुनिल केदार यांनी मांडले. या अहवालावरुन गोंधळ झाल्याने एबी फॉर्म गहाळ झाले असतील तर व ते बडगुजर यांच्यापर्यंत पोहचले असतील तर मग संशयाला जागा निर्माण झाली.
शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना पाठलेला अहवाल. सीमा हिरे यांनी फडणवीसांकडे केलेली तक्रार पाहाता मंत्री गिरीश महाजन हेच या गोंधळाला जबाबदार असल्याचं वातावरण निर्माण झालं. संशयाची सुई महाजन यांच्यावर घेतली गेली. आमदार सीमा हिरेंच्या तक्रारीनंतर याप्रकरणाची चौकशी केली जाईल असे निर्देश स्वत:मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नाशिकमधील या गोंधळामुळे राज्यभर भाजपची नाचक्की झाली. एकीकडे निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नसताना सुधाकर बडगुजर यांच्या एकाच घरात ते स्वत: व त्यांचा मुलगा व पत्नी असे तिघांना उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांना कुटुंबातील एका व्यक्तीची माघार घेण्याचे आदेश दिले. त्यांनंतर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांचा अर्ज प्रभाग २९ मधून माघारी घेण्यात आला. त्याठिकाणी भाजपच्या माजी नगसेविका भाग्यश्री ढोमसे यांना पुरस्कृत करण्यात आलं.
असे असताना महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपात झालेल्या या गोंधळामुळे फटका बसू नये म्हणून या गोंधळाची चौकशी करण्यासाठी रविवारी (दि. ४) नाशिकमध्ये आलेल्या रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये झालेल्या गोंधळाच्या चुका माझ्या पदरात टाका. एबी फॉर्म वाटपाच्या गोंधळाला मीच जबाबदार आहे असं समजा परंतु निवडणुकीत दगाबाजी करु नका, पक्षाला साथ द्या असे आवाहन करत चुकांवर पडदा टाकला. त्यातूनच मंत्री गिरीश महाजन यांना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठिशी घातल्याचे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.