
Samruddhi Mahamarg : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकारलेला ड्रीम प्रोजेक्ट अर्थात समृद्धी महामार्गाचा अमली पदार्थांच्या वाहतुकीसाठीही वापर होऊ लागला आहे. समृद्धी महामार्गाने नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन चार चाकी वाहनांमध्ये गांजाचा मोठा साठा आढळून आला आहे. ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली असून मुद्देमाल जप्त करत गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
एकीकडे राज्याला विकासाकडे नेणारा मार्ग म्हणून समृद्दी महामार्गाचा गवगवा होत आहे. समृद्धी महामार्गाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा आहे. मात्र दुसरीकडे हाच मार्ग अंमली पदार्थांच्या तस्करीचा नवा अड्डा बनू पाहत आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेत 36 लाख, 39 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तब्बल 121 किलो गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूरहून मुंबईकडे गांजाची तस्करी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे समृध्दी महामार्ग परिसरात त्यांनी सापळा रचला. एक वाहन मुंबईच्या दिशेने गेले, दोन वाहनांचा पोलीस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत कारवाई केली. एकूण तीन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी एक संशयित फरार झाला. फरार झालेला संशयित नाशिकच्या टिप्पर गँगचा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे.
फरार झालेल्या संशयिताचे नाव सुनील अनार्थे असून तो नाशिक शहरातील कुख्यात टिप्पर गँगचा सराईत गुन्हेगार आहे. कारवाई दरम्यान जंगलाचा आधार घेऊन जंगलातून तो फरार झाला. नाशिक ग्रामीण पोलिसांचे पथक त्याच्या मागावर आहे. त्याच्यावर शहरातील विविध भागात गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या शिर्डी तसेच श्रीरामपूर परिसरात राहत आहे. त्याचा साथीदार असेलेल्या संदीप याच्यावर पुणे, बुलढाणा, अहिल्यानगर जिल्ह्यात दरोडा आणि चोरी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांना दिली.
या कारवाईत पोलिसांनी भारत चव्हाण ( वय ३५), तुषार काळे (वय २७) आणि संदीप भालेराव (वय ३२) तिघेही रा. नेवासा यांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान ग्रामीण पोलीस दलातील एक अधिकारी आणि एक अंमलदार किरकोळ जखमी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी समृध्दी महामार्गावरून गोमासाची देखील वाहतूक झाली होती. या मार्गाने आता गांजा तस्करी होत असल्याचं उघड झाल्याने अनेक जिल्ह्यांना जोडणारा समृध्दी महामार्ग हा गुन्हेगारांना समृद्ध करु पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच काय तो बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.