

Shrirampur Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. शहरातील पूर्णवादनगर परिसरात जुन्या वैमनस्यातून दोन गट आमने-सामने आले आणि त्यातून शुभम यादव ऊर्फ कल्लू या युवकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला.
या रक्तरंजित हल्ल्यात चाकूचे वार करण्यात आले, तर घटनास्थळी गोळीबारही झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास पूर्णवादनगर चौकात काही युवक बसलेले असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. पूर्वीच्या वादाचा बदला घेण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीने शुभम यादव ऊर्फ कल्लू याला घेरत त्याच्यावर सपासप चाकूने वार केले. याचवेळी गोळीबार (Firing) झाल्याची माहिती समोर आली असून झाडलेली गोळी कल्लूच्या पोटाजवळ लागल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पोलिसांनी (Police) गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र नेमकी जखम चाकूमुळे झाली की गोळी लागल्याने झाली, हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गंभीर जखमी अवस्थेतील शुभम यादव याला तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
हल्लेखोरांच्या तावडीतून कसाबसा सुटलेला शुभम यादव रक्तबंबाळ अवस्थेत जीव वाचवण्यासाठी मुळा-प्रवरा रोडच्या दिशेने पळत सुटला. पळता पळता त्याने एका बंगल्यात आश्रय घेत मुख्य दरवाजा आतून बंद केला आणि थेट दुसऱ्या मजल्यावरील खोलीत जाऊन स्वतःला कोंडून घेतले. अचानक घडलेल्या या थरारक प्रकारामुळे त्या बंगल्यात एकट्या असलेल्या महिलेलाही मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून एका संशयित आरोपीची ओळख पटल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरात गुन्हेगारीने अक्षरशः डोके वर काढले आहे. गोळीबार, प्राणघातक हल्ले, टोळीयुद्ध, वाळू तस्करी, अमली पदार्थांचा वाढता व्यापार आणि नशेच्या इंजेक्शनची अवैध विक्री यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दत्तनगर परिसरातील एका जुन्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची चर्चा असून या वाढत्या गुन्हेगारीमागे नेमका सूत्रधार कोण, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे श्रीरामपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेल्या श्रीरामपूरमध्ये नागरिक आता स्वतःच्या सुरक्षिततेबाबतच साशंक झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.