

Ahmednagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील गणेश सहकारी साखर कारखान्याची गेली निवडणूक प्रचंड गाजली होती. या निवडणुकीत भाजपचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मदतीनं भाजपच्याच राधाकृष्ण विखे पाटलांना होमग्राऊंडवरच पराभवाचा धक्का दिला होता. त्यावेळी ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. आता याच गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत महत्वपूर्ण घोषणा समोर आली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या विखे कुटुंबानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. भाजपचे अहिल्यानगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी यापुढे आम्ही राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी राहाता येथे आयोजित कार्यक्रमात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ऊस उत्पादक यांच्या उपस्थितीतच गणेश साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबतची भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, आम्ही गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुन्हा लढविणार नाही. आमचे कार्यकर्तेही ती निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.
विखे म्हणाले, गणेश साखर कारखाना तुमचाच आहे. आमची लढाई कोणत्याही व्यक्ती विरोधात अथवा कोणतीही संस्था बंद पाडण्यासाठी नसून प्रवरा कारखाना सभासदांचे हक्काच्या पैशांसाठी आहे. ते पैसे राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाहीत, ते प्रवरा कारखान्याचे सभासदांचे आहेत. सभासदांनी उभे केलेल्या त्या पैशांचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही ही कायदेशीर लढाई लढवत असल्याचंही सुजय विखे यांनी सांगितलं.
तसेच ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, हा निर्णय शेतकऱ्यांचा असल्याचं मतही माजी खासदार सुजय विखे यांनी व्यक्त केलं. पण यानंतर त्यांनी गणेश कारखाना आम्ही चालवत असताना इतर कारखान्यांनी आमच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवल्याचा दावा करतानाच आता आमच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार ऊस देण्यास विरोध का केला जात आहे असा खोचक सवालही अप्रत्यक्षपणे कोल्हे आणि थोरातांना केल्याचं दिसून आलं.
सुजय विखे म्हणाले, आमचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. कोपरगावमध्ये दोन आमदार झाले, त्याचा आनंदच आहे. कोपरगावचे भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधानसभा आमदार आशुतोष काळे यांनी विकासाची कामे करावीत, असंही विखे म्हणाले.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 2023 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या युतीनं अहिल्यानगरच्या राजकारणात दबदबा असलेल्या विखे पाटलांचा धुव्वा उडवला होता. 19 पैकी 18 जागा जिंकत थोरात आणि कोल्हे यांनी जिंकत कारखान्यावर आपली सत्ता आणली होती. विखे पाटलांना अवघी एक जागा जिंकता आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.