

Nashik Politics : राज्यातील आदिवासी आश्रम शाळा आणि शिक्षण संस्थांबाबत महायुती सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. या संदर्भात राज्य सरकारचा निर्णय कारणीभूत ठरला आहे.
राज्यातील आदिवासी आश्रम शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश तसेच आहारांसह अनेक विषयांत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून नाशिक येथे आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कास्ट्राईब शिक्षक संघटनेने राज्य सरकारच्या भूमिकेला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके अडचणीत सापडले आहेत.
नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी आमदारांवर देखील दबाव निर्माण झाला आहे. आदिवासी संघटनांनी याबाबत आमदारांना खिंडीत गाठले आहे. त्यामुळे महायुती सरकार दबाव वाढत आहे.
या स्थितीत गेले काही दिवस जेन झी आणि विद्यार्थ्यांना संघटित करून देशभर वातावरण निर्मिती करण्याचे काम काँग्रेस करीत आहे. राहुल गांधी यांच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. भाजप त्या विरोधात आक्रमक बनले आहे.
या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते आदिवासी आंदोलकांची भेट घेणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधी यांच्या पाठिंब्याने या आंदोलकांमध्ये जोश निर्माण झाला आहे.
राहुल गांधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार विरोधात भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणि विशेषता मुख्यमंत्री टार्गेट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांचा नाशिकचा दौरा भाजपसाठी राजकीय अडचण ठरण्याची चिन्हे आहेत.