
Uddhav Thackrey News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आज झाले. या शिबिरात दिवसभर विचार मंथन झाले. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा पंचनामा करण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नव्या दमाने कार्यरत होण्याचा संदेश देण्यात आला.
या शिबिराचा समारोप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने झाला. राज्यभरातील प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. भाजप हा हिंदुत्ववादी असल्याचा खोटा आव आणतो असा थेट आरोप त्यांनी केला.
शिवसेना कामाच्या आधारे युवकांमध्ये कोणताही सामाजिक भेदभाव करीत नाही. शिवसेनेच्या कामाकडे आकर्षित होऊन मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला जवळचे मानले आहे. याबाबत भाजपने अपप्रचार करण्याची गरज नाही. प्रचार शिवसेना कार्यकर्त्यांनी खोडून काढला पाहिजे.
भाजप युवकांमध्ये जातीय भेदाभेद निर्माण करून त्यांच्या अडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. भाजपचे हिंदुत्व हे खोटारडे आहे. निवडणुकीत प्रचार करताना 'बटेंगे तो कटेंगे' असे म्हणायचे. बिहारमध्ये मतासाठी 'बाटेंगे तो जितेंगे' हे त्यांचे धोरण आहे. भाजप नेते कोणाचेच नाही, वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे.
वक्फ विधेयकावर दोन दिवस संसदेत झालेल्या चर्चेत भाजपच्या नेत्यांनी काय भाषणे केली आहेत, याचे त्यांनीच आत्मपरीक्षण करावे. हाच भाजप आम्हाला मुस्लिमांचे भले करायचे आहे, असे सांगत आहे. प्रत्यक्षात त्यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी आपल्या मित्रांना वाटायच्या आहेत. मुंबई तर अदानीला दिलीच आहे आता वक्फ बोर्डाची बारी आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाबद्दल स्पष्ट सांगितले आहे. शिवसेनेच्या दृष्टीने हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येक नागरिक हा राष्ट्रभिमानी असला पाहिजे. आपल्या धर्म घरापुरता मर्यादित ठेवावा. घराच्या बाहेर पडल्यावर तो देशभिमानी असला पाहिजे. असे स्पष्ट हिंदुत्व आमचे आहे.
शिवसेनेने हिंदुत्व कधीही सोडलेले नाही. भाजपला सोडले आहे. भगवा एकच आहे. तीच आमची ओळख आहे. महाराष्ट्रात आम्ही मराठी, मात्र राज्याबाहेर देशांमध्ये हिंदू, हे आमचे धोरण आहे. हिंदुत्व जोपासणारा महाराष्ट्र धर्म घराघरात पोहोचवायचा आहे. आम्ही जय श्रीराम बोलू पण त्याच वेळी तुम्हाला देखील जय शिवाजी, जय भीम, जय महाराष्ट्र बोलावेच लागेल.
भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी आहे, हाच एक खोटा गैरसमज आहे. हे फेक नॅरेटिव्ह भाजपने पसरवले आहे. तमिळनाडूत यांनी मतांसाठी अन्नद्रमक पक्षाशी युती केली आहे. या पक्षाने हिंदुत्ववादाला प्रखर विरोध केला आहे. वक्फ निर्णयाला विरोध केला आहे. मग भाजप त्यांच्याबरोबर युती कसा करू शकतो? काश्मीरमध्ये मेहबूबा, आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू, बिहारमध्ये नितीश कुमार हे सगळे सोयीचे राजकारण हिंदुत्व आहे का? असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
भाजप महाराष्ट्राला ओरबाडत आहे. जनतेची लूट करत आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली केलेला खेळखंडोबा आणि पापे एका पुस्तिकेद्वारे जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. शिवसेना आगामी काळात करील. भाजपने जनतेसाठी निर्माण केलेले भ्रम पुसून टाकण्याचे काम आगामी काळात शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला करावे लागणार आहे.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.