
Vasant Gite News: महायुती सरकारने महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती केली. या विरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक पद्धतीने पुढे आली. या पार्श्वभूमीवर आज राज आणि उद्धव ठाकरे यांचा संयुक्त मेळावा होत आहे.
मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांनी भाजप पक्षावर सडकून टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आंदोलन आणि समाजकारणाचे बाळकडू दिलेले हे दोन्ही नेते आहेत. भाजप ते एकत्र येऊ नये यासाठी आटापिटा करीत आहे.
भाजप हा १९९२ पासून शिवसेनेच्या मार्गात राजकीय अडथळे आणत आला आहे, असा आरोप त्यांनी केला. छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेची युती नको अशी भूमिका भाजपने घेतली होती. तेव्हापासूनच भाजप सातत्याने शिवसेनेच्या विरोधात कारस्थान करीत आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ केले, ही चूक झाली.
भाजप आणि भाजप नेत्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांचे नगरसेवक आणि नेते फोडण्याचे काम सुरू आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने शंभर प्लस चा नारा देऊन इडी, सीबीआय, पोलीस याद्वारे भ्रष्ट, गुन्हेगार, दरोडेखोर अशा सगळ्या टोळ्या एकत्र करण्याचे काम सुरू केले. हे सर्व फक्त महापालिकेची लूट करण्यासाठी सुरू आहे.
गेल्या आठ वर्षात नाशिक महापालिकेला भाजपने काहीही दिलेले नाही. नाशिक शहर दत्तक घेऊन त्याला रस्त्यावर भीक मागायला सोडून दिले. वाढती गुन्हेगारी, खड्डे, भूसंपादनाचे घोटाळे, गोदावरी प्रदूषण, वाहतूक कोंडी हे सर्व प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कोणाची होती? असा प्रश्न त्यांनी केला.
राज्यात कोणत्या महापालिकेत माजी नगरसेवकांना निधी देण्याचे काम होत आहे. मोदी पक्षातील नगरसेवक फोडण्यासाठी चक्क राज्य शासनाच्या निधी वापरला जात आहे. हे सर्व काही प्रकार फक्त सत्ता मिळवण्यासाठी आहे, नाशिकच्या विकासाशी भाजपला काही देणे घेणे नाही.
राज आणि उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळकडू दिले आहे. शिवसेनेत कार्यकर्ते तयार होतात आणि शेवटपर्यंत निष्ठेने राहतात. हे निष्ठेचे बाळकडू साखर सम्राट किंवा अन्य नेत्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठे मिळत नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर महाराष्ट्राचे चित्र शंभर टक्के बदलेल असा दावा माजी आमदार गीते यांनी केला.
दोन्ही ठाकरे आज एकत्र येत आहेत. या मेळाव्याची धास्ती भाजपला झोप येऊ देणार नाही. प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलेल्या भाजपला जनतेशी आणि राज्याशी काहीच देणे घेणे नाही. त्यांनी राज्याची आणि जनतेची प्रातःरणा केली आहे. त्याला ठाकरे बंधू मेळाव्यातून उत्तर देतील. आगामी महापालिका निवडणुकीसाठी हा मेळावा टर्निंग पॉईंट ठरेल, असा दावाही गीते यांनी केला.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.