
Maharashtra politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय गुजरात' अशी घोषणा केल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यावरुन राजकारण तापलं असताना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र शरद पवार यांच्या घोषणेचा दाखला देत शिंदे यांची पाठराखण केली आहे.
फडणवीस म्हणाले, आपल्याला मी आठवण करुन देतो, यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना, माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र व जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ काय...त्यांचे कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्यासंदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम झालं आणि महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं इतका संकोचित विचार मराठी माणसाला शोभत नाही.
मराठी माणूस हा वैष्विक आहे. याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे. याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलं आहे. भारतातील मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचे काम याच मराठी माणसाने केलं आहे. एवढा संकोचित विचार जर कुणी करत असेल तर ते चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले विरोधकांजवळ मुद्देच राहिले नाही, लोकांच्या मनात काय आहे तेच त्यांना माहित नाही. लोकांवर ज्या मुद्द्यांचा परिणाम होत नाही असे मुद्दे विरोधक उचलत असल्याचं ते म्हणाले.
मुंबईत मनसेने अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली. त्यासंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले, भाषेवरुन मारहाण करण चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे. महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहीजे हा आग्रह चुकीचा नाही. पण, एखाद्या व्यावसायिकास मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचे आहे. उद्या, आपले अनेक मराठी भाषिक लोकं वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यावसाय करतात त्यातील अनेकांना त्या राज्यातील भाषा येत नाही, म्हणून त्यांच्याशी देखील अशीच वागणूक होईल का ? भारतात अशा प्रकारची वागणूक व गुंडशाही योग्य नाही. तसं कुणी करत असेल तर त्यावर योग्य कारवाई केली जाईल असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.
एखादा मराठी व्यापारी जर आसाम मध्ये जाऊन व्यापर करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा येत नसेल तर त्याला काय तिथल्या लोकांनी मारायचं का? खरा अभिमान असेल तर मराठी शिकवा, मराठी क्लासेस सुरु करा, आपल्या मुलांना मराठी शिकवा मराठी शाळेत टाका, अशा शाळेत का टाकतात जिथं मराठी भाषा ही तिसरी भाषा आहे.
महानगपालिकेच्या अशा शाळा का सुरु करता की जिथं स्पष्टपणे लिहंलय की , मराठी ही तिसरी भाषा असेल. हे इकडं चालतंय आणि तिकडे व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. आपण महाराष्ट्रात आल्यानंतर एखाद्याला मराठी शिका हा आग्रह करु शकतो पण दुराग्रह करु शकत नाही. असं ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.