जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी यांनी आजच्या राजकारण व राजकारण्यांवर परखडपणे भाष्य केले आहे. आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याची ही फळं आहेत. अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही, 60 टक्के लोकं अपुरे राहतात, लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे, काय उपयोग आहे लोकशाहीचा? असे नेमाडे म्हणाले आहेत. जळगावातील जैन हिल्स येथे जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं, या सोहळ्या नंतर ते बोलत होते.
भालचंद्र नेमाडे म्हणाले, आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याची हे फळं आहेत, आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते? चांगल्या लोकांनी यात पडूच नये, असं झालंय. आता आपल्या हातात आहे, आपण निवडून कोणाला देतो. कुठला चांगला माणूस धजेल यात, खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही. आपल्याला उद्याची काळजी असते काय खावं, काय नाही. अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही, हे सांगतात पण 60 टक्के लोकं अपुरे राहतात, त्यांना समतोल अन्न मिळत नाही, नीट सगळ्या गोष्टी मिळणं हे होत नाही आपल्याकडेफार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे, काय उपयोग आहे लोकशाहीचा?आपण कुणाला मत देतोय हे कळल्याशिवाय कशी सुधारणा आह?
माझ्या कवितांमधून, कादंबरींमधून मी फार दिवसांपासून हे सांगतोय. आपल्याकडे दुर्देवाने असं झालय की, चांगलं काय आणि वाईट काय हे कळेनासं झालंय. नुसतीच देवता म्हणून आईची, बायकांची पूजा करायची. प्रत्यक्षात मात्र नुसतं यंत्र म्हणून वापरायचं. काम-धामापुरतं वापरायचं. स्त्रियांना अधिकार काहीच नाहीत. संपत्तीचे अधिकार नाही, आताच आलंय आपल्याकडे, पण ते ही कोणी देत नाहीये. अशी वाईट परिस्थिती स्त्रियांची आहे. सगळ्याच स्तरात अशी परिस्थिती आहे. दर तीन चार मिनिटाला आपल्या देशात एक बलात्कार होतो. काय देश आहे हा? असं रोखठोकपणे नेमाडे म्हणाले.
दिल्लीत सात नंतर स्त्रिया घराबाहेर पडत नाहीत. संध्याकाळी दिल्लीत स्त्रिया बाहेर दिसत नाहीत. भिती आहे सर्वांना, अशा प्रकारे आपण वागलो तर काय करायची अशा प्रकारची संस्कृती? आज ना उद्या आपण सर्वांच्या हातात, सर्व अधिकार दिले पाहिजे. वीस हजार वर्षांपूर्वी जसं होतं. तेव्हा स्रियांच्या हाती सर्व सत्ता होती. हे आपण पुन्हा सुरू केलं पाहिजे. तरच आपण पुढे काही पाऊल टाकू. आताप्रमाणे चालणं हे बरोबर नाही, असे ही नेमाडे म्हणाले.
आपल्याकडे सर्व प्रकारचे लोक आहेत. सगळ्या जातीचे लोक आहेत, मुसलमानापासून सर्वांनी आपल्या देशाला वर आणलेले आहे. संत तुकाराम महाराजांचे गुरू सुफी होते, संत एकनाथांचे गुरू मुसलमान होते. आपल्या देशात आपण सर्व एकत्र आहोत. मात्र ‘फॅसीझम’वाढविणे यामुळे आपण मागे पडत आहोत. हेच जर वाढत गेल तर आपण मागे मागे जावू, हे आता लोकांच्या हातात आहे. आता पर्यंत इतिहास पाहिला तर, या देशाकरीता कोणी काय ‘काँन्ट्रीब्युशन केलं आहे. याची आपल्याला माहिती पाहिजे. त्यामुळे
अस कंस म्हणता येईल. अमूकच वाईट आणि तमुकच वाईट. युध्दापेक्षा आपली वाटचाल आचार्य विनोबा भावे ‘जय जगत’म्हणत होते, त्याच प्रमाणे आपली वाटचाल गेली पाहिजे.आपण जे ‘नॅशनॅलीझम’करीत आहोत, त्यामुळे आपले फार नुकसान होत आहे. पूर्वीच्या आपल्या ‘पसायदान’याकडे वळले पाहिजे. सर्वांचे सुख होवो, सर्वाना मंगळ मिळो, हेच तत्व - आपलं तत्व तेच आपण पाळून, याचा द्वेष कर, त्याचा व्देष कर हे आपण टाळंल पाहिजे. आणि त्यातच सर्वांच भलं आहे, असे नेमाडे म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.