
Vidarbha News : विधानसभेला ठरवून गेम झालेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आता महायुती सरकारविरोधात दंड थोपटलं आहे. त्यांनी आता बेमुदत अन्नत्याग छेडलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहेत. यावेळी त्यांनी आता अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी रविवारी (ता. 8) या माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह प्रहार संघटनेच्या आंदोलनाला सुरूवात झाली. बच्चू कडू म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.
कडू म्हणाले, हे आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी करत आहे. सरकारनं आम्हांला आश्वासनं दिली होती. मात्र, आजतागायत त्यांची पूर्तता झालेली नाही. पण आता आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आम्ही पुकारलेलं अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. घरकुल,मच्छीमार आणि मेंढपाळांसह अनेक मुद्दे आहेत. वारंवार पाठपुरावा करुनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.
प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांनी यावेळी आमदारांच्या वाढलेल्या पगारावरुन महायुती सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, एकीकडे मनरेगाच्या मजुरांचे पगार 200 वरून 250 झाले,तर दुसरीकडे आमदारांचे पगार 90 हजारांवरून 3 लाख करण्यात आले. केवढी ही तफावत आहे. दिव्यांगांना 1500 रुपयांत जगता येते हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. अजित पवार (Ajit Pawar) यांना अडीच लाख पगार आहे. खरंच त्यांना एवढ्या पगाराची गरज आहे का? येत्या 14 तारखेला या आंदोलनाचं चित्र बदलणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आपण अन्नाचा एक कणही खाणार नाही.आता कार्यकर्त्यांनी समोर आलं पाहिजे. बच्चू कडू गेला पाहिजे, अशीच सरकारची भावना असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दिव्यांगाना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही. त्यावर अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहे. परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नसल्याचा हल्लाबोलही बच्चू कडू यांनी यावेळी केला.
बेमुदत आंदोलन छेडलेल्या बच्चू कडू यांनी यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहे, म्हणून एकत्र येऊ नये. तर मुद्द्यांवर एकत्र आले पाहिजे. मुंबई वाचवणं फार महत्त्वाचं आहे. ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र झाले तर फार चांगले होईल, असंही त्यांनी सांगितलं.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत केलेल्या आरोपांवर बच्चू कडू यांनी भाष्य करताना ईव्हीएम मशीन काँग्रेसचं पाप असून त्यांनी बी पेरलं आणि भाजपनं या बियाला विषारी फळ लावलं अशी घणाघाती टीकाही केली.
बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर यावेळी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू आहे. हिरवा, निळा, भगव्यामध्ये लोक विखुरल्या जात आहे. जी हवा देशात सुरू आहे ती बदली गेली पाहिजे. शेतकरी आंदोलनात येण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. पण हा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी बलिदान करायला तयार आहे,अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.