
Amravati, 16 January : लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर बहिणीसोबत भावांना रोजगार देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्यकर्ता प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यांना १० हजार रुपये मानधन देण्यात येत आहे. त्यांचा सहा महिन्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी संपत आला आहे. महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतला असून लाडक्या भावांना बेरोजगार करू नका, अशी मागणी मोर्शीचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे मागील 2019 च्या निवडणुकीत मोर्शी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते. त्यांनी तत्कालीन कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके झाले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येण्याची ऑफर त्यांनी धुडकावून लावली होती.
महायुतीत असतानाही त्यांच्या मोर्शी विधानसभा मतदारसंघावरचा दावा भाजपने सोडला नाही. त्यांचा आग्रह बघून अजित पवार यांनी महायुतीचा धर्म सोडून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आणि भाजप या तिरंगी लढतीमुळे भुयार यांचा पराभव झाला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात उमेदवारांपैकी सहा निवडून आले. भुयार हे त्यास एकमेव अपवाद ठरले आहेत.
आमदार असताना कोणाच्या संपर्कात राहत नसल्याचा आणि फोन उचलत नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. असे असले तरी पराभवानंतर भुयार ॲक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. त्यांनी लाडक्या भावांचा विषय हाती घेऊन आपण सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. लाडक्या भावांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवा, अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युवा प्रशिक्षणार्थी म्हणून हा कालावधी फक्त सहा महिन्यांचा आहे. तो फेब्रुवारी २०२५ मध्ये समाप्त होणार आहे. त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहे.
महाराष्ट्रातील विविध विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. प्रत्येक कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी युवकांनी चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे. त्यांना संपूर्ण कामांचा अनुभव असल्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनेमध्ये कार्यरत आहेत, तिथेच त्यांना नियमित करण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 100 दिवस जाहीर केले आहे. त्यामधे दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या, अशी मागणी भुयार यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.