
Fadnavis Government : रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप कायम आहे. यात आता भंडारा जिल्ह्याची भर पडली आहे. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडले आहे. त्यांच्या जागी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या या घडामोडींमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निर्णयामागे नेमके काय राजकारण आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे?
संजय सावकारे भुसावळचे आमदार आहेत. भौगोलिकदृष्ट्या त्यांना भंडारा जिल्हा लांब पडतो. जिल्ह्यात येण्यासाठी त्यांना 8 ते 10 तास लागतात. त्यामुळे ते नियमित येऊ शकत नव्हते. जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि स्वातंत्र्य दिनासारख्या अत्यावश्यक शासकीय कार्यक्रमालाच ते फक्त हजेरी लावत होते. त्यामुळे त्यांनीच भंडारा जिल्हा नको असे सांगितल्याचा दावा केला जात आहे. शिवाय भंडारा जिल्ह्यातील कुठल्याही आमदारासोबत त्यांचा वाद नव्हता, त्यामुळे या निर्णयावर चर्चा करण्याची गरज नाही, असे दावे केले जात आहेत.
मात्र सावकारे यांनी राजकीय दबावातून देखील पालकमंत्रीपद सोडले असावे, अशी चर्चा सध्या भंडारा जिल्ह्यात आहे. भाजपच्याच एका ‘सुपर पालकमंत्र्यांचा‘ निर्णयांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप होऊ लागल्याने त्यांनी पालकत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. "स्थानिक आमदारांना निधी देऊ नका, कामे देऊ नका असा दबाव टाकला जात असेल तर हे चुकीचे असल्याचे सांगत भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी अप्रत्यक्षपणे भंडारा जिल्ह्यात भाजपचा नेत्याचा दबाव असल्याचे सूचित केले.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले, संजय सावकारे यांनीच स्वतः अनेकदा भंडारा नको असल्याचे सांगितले होते. भुसावळच्या आसपासचा जिल्हा त्यांनी मागितला होता. कदाचित यामुळे त्यांना बदलण्यात आले असावे. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता हे मला माहीत नाही. मात्र भाजपमधील अंतर्गत राजकराणामुळे ते नाराज असावे, अशी शंका भोंडेकर यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीमधून आम्हाला निधी मिळत नाही. बाहरेच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेल तर तो वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक जिल्ह्यातील पालकमंत्री असावा अशीही आमची मागणी असल्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्याला नेहमीच बाहेरचा पालकमंत्री देण्यात येतो, त्यामुळे यावेळी तरी स्थानिक पालकमंत्री द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सावकारने यांनीच अनेकदा भंडारा जिल्हा बदलून देण्याची विनंती केली होती असे सांगितले. भुसावळवरून भंडारा येथे जाण्या-येण्यात बरेच तास लागायचे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला मध्यरात्री 3 वाजता आले होते. त्यांच्याच विनंतीवरून सावकारे यांना बदलण्यात आले. यात कुठलेही राजकारण नाही. गृह राज्यमंत्री पंकज भोयर वर्ध्याचे आहेत. त्यांचा जिल्हा शेजारीच असल्याचे फुके यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.