
Nagpur News : किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर विरोध केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीसुद्धा भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. ते विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या फरकांनी निवडूनसुद्धा आले आहेत. आता मुनगंटीवार यांना डावलून भाजपचे नेते जोरगेवार यांना खतपाणी घालत असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. यावर मुनगंटीवार यांनी फक्त खतपाणी घातल्याने किंवा बाहेरून ताकद दिल्याने कुठालाही नेता मोठा होत नाही तर त्यासाठी कुवत आणि कार्यक्षमता लागते असा टोला लागावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी चंद्रपूरला आले होते. या कार्यक्रमाला मुनगंटीवार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांनी नाराजी कायम असल्याचे बोलले जात आहे. मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनात जाण्याचे टाळले होते. आपले नाव मंत्रिमंडळाच्या यादीत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्याशी याबाबत चर्चासुद्धा केली होती. मात्र, प्रत्यक्षात शपथविधीच्या दिवाशी मंत्रिमंडळाच्या यादीतून आपले नाव गायब झाले. कुठल्या पेनाची शाईने आपले नाव लिहले होते हे समजायला मार्ग नाही, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली होती.
त्यानंतर अनेक कार्यक्रामांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. नागपूरमध्ये भाजपच्यावतीने (Bjp) आयोजित करण्यात आलेल्या आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला पाठ दाखवली होती. आज पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या समोर जाण्याचे त्यांनी मुद्दामच टाळल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे आमदार जोरगेवार पूर्ण वेळ मुख्यमंत्र्यांच्या सोबत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत स्वतः मुनगंटीवर यांनी खुलासा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रमासाठी फोन येऊन गेला. मात्र मी उद्या शिर्डीला जाणार आहोत आणि शिफ्टिंग सुरू असल्याने येऊ शकत नसल्याचे त्यांना कळविल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
जोरगेवार यांनीसुद्धा फोन केला होता. तो मिसकॉलमध्ये कन्व्हर्ट झाल्याचे सांगितले. यावेळी त्यांना तुम्हाला डावलून जोरगेवारांना खतपाणी घातले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे यावर आपले मत काय अशी विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी लगचे प्रत्युत्तर दिले. बाहेरून ताकद दिल्याने कोणी मोठा नेता होत नाही. त्याच्यात आवश्यक तो गुण, क्षमता असावी लागते. आपले म्हणणे स्पष्ट करताना त्यांनी झाडांचे उदाहरण दिले.
वनमंत्री असताना मी कोट्यवधी झाडे लावली. प्रत्येक झाडाची उंची व क्षमता आणि मर्यादा ठरली असते. जास्तीचे खतापाणी दिल्याने कुठलेही झाड मर्यादेपेक्षा मोठे किंवा ऊंच होत नाही. त्या झाडातच गुण असावा लागतो. फक्त खतपाण्याने झाडे उंच झाली असती तर ती शंभर फुटांपेक्षा मोठी करता आली असती असाही टोला त्यांनी लागावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.