
Nagpur, 29 April : प्रशासनात अधिकारी होण्यासाठी एकवेळा परीक्षा दिली की निवृत्तीपर्यंत विविध पदांवर अधिकाऱ्यांना राहता येते. लोकप्रतिनिधींना मात्र रोज परीक्षा द्यावी लागते, असे सांगून उमरेडचे काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रशंसा करून त्यांचे आभार मानले. एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाची काँग्रेस आमदारला भूरळ पडल्याचे दिसून येत आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांचे संबंध विळ्या भोपळ्याचे असतात. सत्ताधाऱ्यांनी कितीही चांगले काम केले किंवा निर्णय घेतले तरी त्यात त्रुटी काढायची, शंका घ्यायची आणि आरोप करण्याचे काम विरोधकांमार्फत केले जातात. खासगीत तसेच बैठकांमध्ये आभार मानणारे विरोधक माध्यमांसमोर येऊन विरोधात मतप्रदर्शित करतात.
हा आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शिरस्ता झाला आहे. विरोधकांमार्फत सत्ताधाऱ्यांची प्रशंसा किंवा धन्यवाद मानण्याचे प्रसंग हल्ली अपवादानेच दिसतात. मात्र, काँग्रेसचे आमदार संजय मेश्राम (MLA Sanjay Meshram) हे त्यास अपवाद ठरले आहेत. त्यांनी विरोधासाठी विरोध न करत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानले आहेत.
नागरिकांना लोकाभिमुख, पारदर्शी, तत्पर सेवा देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू केला आहे. या अंतर्गत सरकारच्या ३३ विभागाच्या एक हजार २७ सेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवा विहित कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहेत. यातील ५८३ सेवा ऑनलाईन असून उर्वरित सेवा येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयावर आमदार संजय मेश्राम म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांना सेवा क्षेत्राची उत्तम जाण आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ज्या काही सुधारणा आवश्यक वाटतात, त्यासाठी त्यांनी केलेले बदल व सेवा हक्क अधिनियमासंदर्भात घेतलेला पुढाकार हा त्यांच्या सेवा क्षेत्रातील कटिबद्धतेचे प्रतीक आहे.
काही वर्षांपूर्वी बास्केटबॉल संघटनेचे काम करताना त्यांच्या सेवा क्षेत्राबाबत असलेल्या तळमळीचा मला प्रत्यय असल्याचे संजय मेश्राम यांनी मोकळेपणाने सांगितले. सध्या महायुती सरकार आणि काँग्रेसचे संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ईव्हीएम मॅनेज करून महायुती सत्तेवर आल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांमार्फत केला जात आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. या मागे काही तरी कारस्थान असल्याची शंका काँग्रेसच्या नेत्यांना आहे. पराभूत झालेल्या अनेक उमेदवारांनी निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार संजय मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामांची केलेली प्रशंसा लक्षवेधी मानली जाते.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.