
Nana Patole News : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारून हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांना पक्षातर्फे कुठली जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पटोले यांनी राजीनाम्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळाच पक्षाचा नेता होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र तीसुद्धा पक्षाने मान्य केली नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक समजले जाणारे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे पटोले यांच्या काँग्रेसने साईडट्रॅक केल्याचे मानले जात आहे.
भंडारा-गोंदियाचे भाजपचे खासदार असताना पटोले यांनी मोदी यांच्या विरोधात अचानक मोहीम उघडली होती. यानंतर त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला. राहूल गांधी यांच्या गुजरात येथील जाहीर सभेत जाऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन त्यांनी आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भिडणारा नेता अशी ओळख त्यांनी आपली निर्माण केली. गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढून त्यांनी आपले वजन वाढवले. त्यानंतर लोकसभेऐवजी पुन्हा आपल्या विधानसभा मतदारसंघात परतले. तेव्हाच त्यांनी कुठल्याही परिस्थिती प्रदेशाध्यक्ष व्हायचे ठरवले होते.
उद्धव ठाकरे भाजपला सोडून महाविकास आघाडीत आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आले होते. वर्षभर ते अध्यक्ष राहिले मात्र प्रदेशाध्यक्ष व्हायचे असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पटोले यांनी सर्वांनाच अंगावर घेतले.
आघाडीत असातानाही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकाटीपणी करण्यास त्यांनी मागेपुढे बघितले नाही. त्यांच्याच कार्यकाळात निघालेल्या राहूल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेला मोठा प्रतिसाद लाभला. त्यामुळे राहूल गांधी यांच्यसोबत त्यांची चांगलीच जवळीक वाढली होती.
नाना पटोले यांचे धाडसी वक्तव्य आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत घेतलेल्या निर्णयामुळे अनेकजण अस्वस्थ होते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह अनेकांनी त्यांना हटवण्याचे प्रयत्न केले. मात्र राहुल गांधी यांच्यामुळे कोणालाच यात यश आले नाही. यातच लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश लाभले. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांना मिळाले. आता विधानसभा आपलीच असता समज महाविकास आघाडीने करून घेतला होता.
भावी मुख्यमंत्री म्हणून पटोले यांचे नाव चर्चेत आले. मोठा भाऊ म्हणून पटोले यांनी भांडून जास्त जागा मागणे सुरू केले. त्यामुळे आघाडीत मोठे मतभेद निर्माण झाले होते. काही जागा मित्रपक्षासाठी सोडल्याने पटोले यांना आपल्याच नेत्यांचा रोष ओढावून घ्यावा लागला. सोबतच विधानसभच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फुगा फुटला. सर्वाधिक जागा लढणाऱ्या काँग्रेसला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले.
पक्षांतर्गत विरोधकांनी त्यांच्यावर निशाना साधणे सुरू केले. वाढता विरोध आणि पक्षश्रेष्ठींची नाराजी बघून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये त्यांनी आपल्याला आता विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा नेता व्हायची असल्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तीसुद्धा काँग्रेसने पूर्ण केली नाही. त्यामुळे नाना पटोलेंना पक्ष संघटनेत काम करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.