

महाराष्ट्रात मतदार याद्यांमधील घोळावरून राजकारण तापले असून काँग्रेसने भाजपवर मतचोरीचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केले, मात्र मतचोरीचा आरोप फेटाळला.
फडणवीस म्हणाले की, दुबार नावांमुळे कोणी दोन ठिकाणी मतदान केले असा अर्थ होत नाही, हे आरोप विरोधकांनाही लागू होतात.
Nagpur News : सध्या मतचोरी आणि मतदार याद्यांचा घोळ हा मुद्दा चांगलाच तापला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे थेट मतचोरीचा आरोप भाजपवर करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी केली आहे. काँग्रेसने मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी एक समिती नेमली आहे. यातून दुबार नावांचे प्रकारही समोर आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले आहे. मात्र याचा अर्थ दुबार नावे असलेल्या मतदारांनी एकाच निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केले असा होत नाही, असे सांगून त्यांनी मतचोरीचा आरोप फेटाळून लावला. दुबार नावांमुळे आम्ही निवडून आलो या आरोपांवर विरोधक ठाम असतील तर ते त्यांनासुद्धा लागू होतात याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रामगिरीवर पत्रकारांसोबत संवाद साधला. या दरम्यान त्यांनी विरोधकांच्या मतचोरीचे आरोप आणि मतदार याद्यांमधील घोळावरही भाष्य केले. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे त्यांनी मान्य केले. ते म्हणाले, हा घोळ आजचा नाही. वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. आपण या विरोधात 2012 साली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्याचा निकाल अद्याप लागलेला नाही.
मतदान नोंदणी आणि मतदार याद्यांमधून नाव काढण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागतात. मात्र मतदार यादीतून नाव वगळण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. थेट सहा नंबरचा फॉर्म भरून मतदार आपली नावे नोंदवतात. शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमधून लोक नोकरी व कामानिमित्त स्थायिक झाले असतात. त्यांची नावे मूळ गावातील मतदार याद्यांमध्ये कायम असते. ज्या ठिकाणी स्थायिक झाले तेथेही ते नोंदणी करतात.
शहरांमध्ये भाड्याने राहणारे घरेसुद्धा बदलवत असतात. ते जिथे वास्तव्यास जाता त्या भागातील मतदार याद्यांमध्ये आपली नावे नोंदवतात. त्यामुळे एकचा मतदाराचे नावे वेगवेगळ्या ठिकाणी आढळते. हा घोळ आहेच. तो मलासुद्धा मान्य आहे. असे असले तरी एकच मतदार वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करत नाही. याचा काही निवडणुकीच्या निकालावर परिणाम होत नाही. फक्त मतदानाच्या टक्केवारीवर होतो असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हा घोळ ग्रामीण भागात फारसा दिसत नाही. गावची लोकसंख्या कमी असते. कोण आला आणि गेला याची माहिती प्रत्येकाला असते. आम्ही निवडून आलो तर मतचोरी केली असे आरोप केले जातात. विरोध निवडून आले तर आम्हीसुद्धा हेच आरोप करायचे का असा सवालही फडणवीस यांनी केला. काँग्रेसचे आमदार, खासदार निवडून आले त्या मतदारसंघातील मतदार याद्यांमध्येसुद्धा दुबार नावे आहेत. त्यासुद्धा आमच्याकडे आहेत. योग्य वेळी त्या समोर आणल्या जातील. या मतदार याद्यांमधील घोळमुळेच विरोधक निवडून, असे आम्ही म्हणायचे का? असेही मुख्यमंत्री म्हणाले.
1️⃣ राज्यात मतचोरीच्या आरोपांवरून वाद का निर्माण झाला आहे?
काँग्रेसने भाजपवर मतदार याद्यांमध्ये घोळ करून मतचोरी केली असा आरोप केला आहे.
2️⃣ फडणवीस यांनी काय मान्य केले आहे?
त्यांनी मतदार याद्यांमध्ये त्रुटी असल्याचे मान्य केले आहे.
3️⃣ फडणवीसांनी मतचोरीबाबत काय म्हटले आहे?
त्यांनी मतचोरीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
4️⃣ दुबार नावांबाबत फडणवीसांचे मत काय आहे?
दुबार नावे असणे म्हणजे दोन ठिकाणी मतदान झाले, असा अर्थ नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
5️⃣ या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
हा मुद्दा आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय पातळीवर गरम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.