
Nagpur Winter Session News : मंत्रिमंडळातून डावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना शायरीतून व्यक्त केल्या. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मी संपलो, परत येणार नाही असे दावे करणाऱ्या विरोधकांना आपल्या शायरीतून प्रत्युत्तर दिले. ‘आंधीयो मे जलता दिया मिल जायेगा, उस दियेसे पुछो, मेरा पत मिल जायेगा... ‘ अशी शायरी त्यांनी सादर केली.
छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी जहा नही चैना, वहा नही रैना...अशी शायरी पेश करून बंडाचे निशान फडकावले आहे. मुनगंटीवार यांनी ‘वक्त आयोगा, वक्त जायेगा‘ असे बोलून आशा कायम असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी फडणवीस यांनी महायुतीला मिळालेल्या यशाचे रसहग्य सांगताना एक शायरी आज विधानसभेत पेश केली. पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर फडणीस यांना विरोधात बसावे लागले होते. या दरम्यान ‘मी पुन्हा येईल' हे त्यांचा भाषणातील वाक्य चांगलेच गाजले होते. ते पुन्हा येतील विरोधात बसण्यासाठी अशी खिल्ली उडवल्या गेली होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत यात आघाडीवर होते.
महाविकास आघाडी फुटल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. त्यावेळी भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ होते. शिवसेनेकडे फक्त चाळीस आमदार असताना भाजपच्या नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले. फडणवीस यांनी बाहेर थांबतो अशी पक्षाकडे विनंती केली होती. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर लोकसभेत झालेल्या महायुतीच्या पराभवामुळे पुन्हा फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले होते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचे टार्गेट ते झाले होते.
मात्र यानंतरही त्यांच्याच नेतृत्वात महायुतीने पुन्हा मुसंडी मारली. महाविकास आघाडीचा(MVA) दारुण पराभव झाला. भाजपचे सर्वाधिक १३२ आमदार निवडून आले. भाजपच्या नेत्यांना डावलणे अवघड झाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी पुन्हा विराजमान झाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणातून आज विधानसभेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, ''पाच वर्षे माझ्यावर आरोप करण्यात आले. महाराष्ट्रात मी एकटा नेता आहे असे टार्गेट करण्यात आले. सर्वांचा विरोध आणि रोख माझ्यावरच होता. व्यक्तिगत टीका करणयात आली. रोज सकाळी उठून माझ्याच नावाने शंखनाद केला जात होता. मात्र याचा फायदा मलाच झाला. जनतेला माझ्यावर झालेली टीका आवडली नाही. त्यामुळे सहानुभुती मिळाली.''
तसेच ''माझा पाच वर्षांचा कारभार जनतेनी बघितला होता. त्यामुळे ३० वर्षांत मिळाले नाही तेवढे मोठे यश भाजप(BJP) महायुतीला मिळाले. ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते महायुतीला जनतेनी दिली आहे. मी आधीच सांगितले होते की मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूव्ह मला भेदता येतो.'' असे सांगून त्यांनी शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.