OBC Protest News : ...अखेर 13 दिवसांनंतर राज्य सरकारला जाग, ओबीसी समाजाला चर्चेसाठी बोलावणं धाडलं
Nagpur : मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देण्याच्या निर्णयानंतर राज्यभरात ओबीसी आंदोलनाला सुरुवात झाली होती. ओबीसी प्रगर्वातून अन्य कोणालाही आरक्षण देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आल्यानंतर ओबीसी समाजाच्या आंदोलनस्थळी जात त्यांना न्याय मिळेल, असा शब्द दिला होता.
त्यानंतरही आंदोलन सुरूच होते. सरकारने मागितलेली मुदत संपत आल्याने सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे सरकारने शुक्रवारीच तातडीने सूत्र हलवत ओबीसी आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण पाठवले आहे.
गेल्या १३ दिवसांपासून उपराजधानी नागपुरात आंदोलन करत असलेल्या ओबीसी समाजाला अखेर राज्य सरकारकडून चर्चेसाठी बोलावणे आले आहे. रविवारपर्यंत चर्चेसाठी बोलावणे न आल्यास सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ व समस्त ओबीसी आंदोलनकर्त्यांनी दिली होता.
अशातच माजी राज्यमंत्री व भाजप नेते डॉ. परिणय फुके(Parinay Fuke) सरकारचे अधिकृत पत्र घेऊन आंदोलनस्थळी पोहाेचले. डॉ. फुके यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना हे पत्र सुपूर्त केले. त्यामुळे बेमुदत अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
सरकारने चर्चेसाठी सुमारे ६० ते ६५ जणांना बोलावले आहे. यात बहुतांश निमंत्रित नागपुरातील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २९ सप्टेंबर राेजी दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथिगृहावर बैठक होणार आहे.
विदर्भातून चर्चेसाठी बोलावलेल्या डॉ. बबनराव तायवाडे, डॉ. अशोक जीवतोडे, सचिन राजूरकर यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार अशोक धावड, शरद वानखेडे, सुभाष धोटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, रमेश पिसे, परमेश्वर राऊत, राजू चौधरी, गुनेश्वर आरीकर, संजय नाथे यांचाही समावेश आहे.
‘तूर्तास आम्ही बेमुदत अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. सरकारशी चर्चा होणार असली तरी साखळी उपोषण आंदोलन कायम राहणार आहे’, असे राष्ट्रीय ओबीसी(OBC) महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी या वेळी स्पष्ट केले. ओबीसी समाजाच्या मुद्द्यावर सरकारने गंभीरतेने बैठकीत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.