राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक संकटांनंतरही मतदारसंघावर आपले प्रभुत्व कायम असल्याचे सिद्ध केले आहे. काटोल तालुक्यातील कातलगुडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून, त्यात अनिल देशमुख गटाच्या सदस्यांनी विजय मिळवला आहे.
कातलाबोडी ग्रामपंचायत निवडणुकीत सात सदस्य व सरपंच यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या सात सदस्य व सरपंचपदी महिलांची निवड करून गावाने आदर्श निर्माण केला आहे. गावाच्या सरपंचपदी अर्चना खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन विकासासाठी महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार गावात आता खऱ्या अर्थाने महिलाराज निर्माण झाले आहे. गावात निवडून आलेल्या महिलांच्या कार्यक्षेत्रात पुरुषांनी हस्तक्षेप न करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख गटांनी एकत्र बसून हा निर्णय घेत आठ महिलांच्या खांद्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी टाकली आहे. या संदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात बुधवारी (ता. २५) म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातील कातलाबोडी या गावाने मोठा आदर्श निर्माण केला आहे.
राज्य सरकारकडून शिंदे, फडणवीस यांनी स्वतः मनोज जरांगे पाटील यांना भेटून आश्वासन दिलं होतं की, एका महिन्यात कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. सरकारची ही मुदत संपली आहे. त्यामुळे सरकारने कुणाचेही आरक्षण न काढता मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण जाहीर करावं, असे अनिल देशमुख म्हणाले.
ललित पाटीलच्या बाबतीत घडणाऱ्या घटना पाहता त्याला सरकारची साथ आहे, अशी चर्चा आहे. ससून रुग्णालयात त्याला नऊ महिने कसे ठेवण्यात आले, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. त्याला सरकारची साथ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हे सगळं गृहमंत्र्यांचं अपयश आहे, त्यामुळे गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, असं अनिल देशमुख म्हणाले.
पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. मात्र, पक्षातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग सापडत नाही. आगामी निवडणुकीत त्यांची काय भूमिका राहील, त्या कुठून निवडणूक लढतील, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. लवकरच पंकजा मुंडे याबाबतीत निर्णय घेतील, असा अंदाजही अनिल देशमुख यांनी वर्तवला.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.