

Pravin Tayde letter : बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आंदोलन यशस्वी केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर या आंदोलनाची धग भाजप महायुती सरकारला चांगलीच पोहोचली. या आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठी सत्ताधारी भाजप महायुतीकडून बरेच प्रयत्न झाले. बच्चू कडू मात्र हटले नाहीत.
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. सत्ताधाऱ्यांनी न्यायालयाचा दणका देण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू यांनी आंदोलनाचा ट्रॅक बदलून सत्ताधाऱ्यांना शह दिला. यानंतर ठोस आश्वासन घेऊनच, बच्चू कडू नागपूर इथलं आंदोलन माघारी घेतली. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या यशानंतर सत्ताधारी भाजप महायुती काहीशी चवताळलेली दिसते आहे. बच्चू कडूंवर घाव घालण्यास आता सुरूवात केली आहे. पहिला घाव, अमरावतीमधील भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी घातला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अमरावतीमधील भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी पत्रव्यवहार करत बच्चू कडू यांनी बांधलेल्या हवामहलची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. प्रवीण तायडे यांच्या पत्रावर बच्चू कडू यांच्याकडून अजून तरी प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेच्या पत्रात म्हटले आहे की, "माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी समाजसेवेचा बुरखा पांघरून आतापर्यंत अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. गोरगरीब जनतेच्या अल्पदरात जमिनी लाटून, त्यांनी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदीच्या काठावर टॉगलाबाद (कुरळपूर्णा) इथं 72 एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्म हाऊस, विविध सुख सुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत."
'पूर्णा नदीच्या काठावर नैसर्गिक वातावरणात उभारलेला या हवामहलासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावण्यात आल्या आहेत. कोट्यवधीचा अवैध पैसा हा परिसर विकसित करण्यासाठी लावण्यात आला आहे. या परिसरात अत्याधुनिक व्हीव्हीआयपी दर्जाच्या सुविधा असलेले बच्चू कडूंचे निवासस्थान आहे. प्रहार पक्षाचे कार्यालय आहे. याच परिसरात उच्च प्रतीची शेती, कारखाना, मिक्सर प्लांट, स्विमिंग पूल यासह अनेक उद्योग धंदे समाजसेवेच्या नावाखाली गोपनीय पद्धतीने चालवले जातात,' असा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे.
'बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. त्या काळात त्यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाचा गैरवापर करून करोडोंचा निधी या परिसरात वापरला. शेतकरी, शेतमजूर व काही कंत्राटदारांची पिळवणूक करून हा संपूर्ण परिसर विकसित करण्यात आला आहे. गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया अगदीच अवैध व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात भागीदारी असलेल्या लोकांकडूनही खंडणी गोळा करून हा 'हवामहाल' उभारण्यात आला आहे,' असा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला.
'या 'हवामहल'ला सरकारने तातडीने सील करून ताब्यात घ्यावे. त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी जेणेकरून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येतील. यासह बच्चू कडू त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संबंधित असलेल्या संस्था, संस्थांमध्ये असलेले भागीदार आणि त्यामध्ये झालेले व्यवहार याचीही चौकशी केल्यास अनेक गोपनीय बाबी सरकारच्या हाती येतील. ज्यातून समाजसेवेच्या नावाखाली बच्चू कडू यांचे सुरू असलेले काळे व्यावसाय समोर येतील,' असेही प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.