

Nagpur Congress : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध माजी मंत्री सुनील केदार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष अश्विन बैस यांनी बोलावलेली बैठकच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बैस यांनी सुनील केदार यांच्या पुढाकारानेच इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला होता.
नागपूर काँग्रेसमध्ये गत २ वर्षांपासून सुनील केदार यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे. ते जिल्हा काँग्रेसची सारी सूत्रे आपल्याच हाती ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. नुकतेच जिल्हाध्यक्ष निवडीतही केदार यांनी अनुभवी बाबा आष्टनकर यांना अवघ्या ७ महिन्यात नारळ देत नवख्या, एकही निवडणूक न लढलेल्या अश्विन बैस यांची नियुक्ती केली.
या सगळ्या वादामुळेच गटबाजीला खतपाणी घालू नका असा निरोप देऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरचे निवडणूक निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मार्फत बैठक रद्द करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही इच्छुकांच्या मुलाखती घेऊन स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांचा आदेश धुडकावून लावला. यावरून निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपूर जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकाराने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला होता. या बैठकीची सूचना नागपूरचे निरीक्षक माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना देण्याला आली नव्हती. याशिवाय पक्षाच्या प्रोटकॉलनुसार वरिष्ठ पदाधिकारी, माजी आमदार, पदाधिकारी, माजी अध्यक्ष तसेच पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी नेमलेल्या जिल्हा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीला बोलावले नव्हते.
सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक या मोजक्या तसेच केदारांच्या समर्थकांनाच बोलावून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार होत्या. याची माहिती मिळताच काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली. त्यांनी याची तत्काळ दखल घेतली. त्यांनी तातडीने नागपूर ग्रामीणचे निरीक्षक वीरेंद्र जगताप यांच्यासोबत उदय मेघे आणि अशोकराव बोबडे यांना नागपूरला पाठवले.
मेघे आणि बोबडे यांनी ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत येऊन ही बैठक अवैध असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सोबतच अशा परस्पर, नियमबाह्य बैठका घेऊन गटबाजीला खतपाणी घालू नका, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना डावलू नका हा अध्यक्षांचा निरोपही बैठकीत उपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांना कळविला. या नंतर ते निघून गेले. विशेष म्हणजे याचा काही परिणाम बैठकीवर झाला नाही. त्यानंतरही इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या समजते.
रामटेक लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा केदारांनी परस्पर रश्मी बर्वे यांचे नाव जाहीर केले होते. जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन एकच नाव पाठवण्याचे आदेश त्यांनी दिले होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा उघडपणे प्रचार केला होता. रामटेक विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी सोडला होता. येथून मुळक यांनी बंडखोरी केली होती. हिंगणा विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी आघाडीने सोडला होता. मात्र यावर मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. केदारांनी समर्थकांना उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.