

Nagpur News: नागपूर विभागातील शिक्षक आणि शाळा संचालकांमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. बोगस शालार्थ आयडी तयार करून बोगस नियुक्त्या केलेल्या शिक्षकांकडून त्यांनी उचल केलेल्या वेतनाची वसुली केली जाणार आहे. नागपूर विभागात असे एकूण ६७२ शिक्षक आहेत. शिक्षकांकडून वेतनाच्या वसुलीसाठी पोलिसांनी न्यायालयात मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्यात शेकडो शिक्षकांची शाळा संचालकांकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली. त्याच आधारे त्यांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करीत बोगस शालार्थ आयडी तयार केले. उपसंचालक कार्यालयातून याविरोधात तक्रार झाल्यावर हा घोटाळा उघडकीस आला. मात्र, चौकशीदरम्यान पोलिस ठाणे आणि सायबर पोलिसांनी उपसंचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शाळा संचालक आणि शिक्षकांवर गुन्हे दाखल केले. त्यात आतापर्यंत २५ जणांना अटक करण्यात आली.
सध्या त्याची एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, आता दोन्ही ठाण्यांकडून स्वतंत्रपणे चौकशी सुरू असून सायबर पोलिसांकडून अद्यापही चौकशीसाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येत आहे. सध्या सायबर पोलिसांकडे ६७२ शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचे दोषारोपपत्रही न्यायालयात सादर केले आहे. मात्र, आता या सर्वच शिक्षकांकडून त्यांनी बोगस आयडीद्वारे उचल केलेल्या पगाराची वसुली करण्यासाठी कलम १०७ नुसार मागणी करण्यात येत आहे.
न्यायालयाकडून तशा सूचना मिळताच, पोलिसांकडून शिक्षकांना वसुलीसाठी पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. सायबर पोलिसांकडून शिक्षकांना सातत्याने चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. चौकशीला येताना, त्यांना सोबत संबंधित कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले होते. जवळपास दीडशे शिक्षकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्यावरही केवळ एक ते दोन शिक्षकच कागदपत्रे घेऊन चौकशीला हजर झाल्याची माहिती आहे.
भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि संदीप जोशी यांनी या घोटाळ्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली होती. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा या प्रकरणात उडी घेतली होती. भाजप नेत्यांच्या शाळांमध्ये सर्वाधिक बोगस भरती झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
एका शिक्षक संचालकाला हटवून त्या ऐवजी भाजपच्या नेत्यांच्या शाळांमधील घोटाळे दाबण्यासाठी सरकारवर दबाव टाकला जात असल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला होता. आपल्याकडे एक एक पुरावे येत आहेत. ते आल्यावर भाजप नेत्यांचा घोटाळ्यातील समावेश आपण बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यानंतर मात्र वडेट्टीवार या वादातून बाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.