

सध्याच्या घडीला महाराष्ट्र आणि देशातील बलाढ्य पक्ष म्हणून भाजपकडे पाहिले जाते. मात्र, बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेली मते भाजपसाठी अत्यंत लाजिरवाणी आहेत. जिल्हाध्यक्ष तथा तीन वेळा आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांच्या पत्नींना ही उमेदवारी होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अंगाशी येणारी ठरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तसे पहिले तर अनेक बड्या राजकीय नेत्यांनी आपल्या घरातील किंवा नात्यातील जवळच्या लोकांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार केले आणि निवडूनही आणले. मात्र, बुलढाण्यात ही किमया साधता आली नाही. त्याला कारणेही अनेक आहेत. माजी आमदार विजयराज शिंदे आणि विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. संजय गायकवाड यांनी वारंवार वरिष्ठांकडे व भाजपकडे युतीचा प्रस्ताव मांडला, नव्हे युती करण्यासाठी पुढाकारच घेतला. परंतु जिल्हाध्यक्ष असलेल्या विजयराज शिंदे यांना पक्षातील वरिष्ठांना ही बाब पटवून देता आली नाही किंवा त्यांनी जाणीवपूर्वक ती पटवून दिली नाही, असेही म्हणता येईल. मग पक्षानेही शिंदे यांच्या पत्नी अर्पिता यांनाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि निवडून आणण्याची जबाबदारीसुद्धा विजयराज यांच्यावर आली.
दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पूजा गायकवाड होत्या. विजयराज शिंदे तीन वेळा आमदार होते; मात्र या तुलनेत संजय गायकवाड यांनी पहिल्याच पंचवार्षिकमध्ये कोरोनाचे संकट असताना कमी कालावधीत शहराचा चेहरामोहरा बदलला. एवढेच नव्हे तर प्रत्येक समाज घटकाला जोडून ठेवण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले. प्रत्येक समाजाच्या स्मारक किंवा पुतळे उभारले. शिवाय नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार फायनल होण्यापूर्वीच प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील जाणकारांना एकत्र करून त्यांचे मेळावे घेतले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय गेल्या पाच-सहा वर्षात केलेली विकासकामे लोकांसमोर मांडली आणि मी देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले.
त्याचवेळी माजी आमदार शिंदे यांनी आधीच कमी असलेल्या जुन्या जाणत्या भाजपच्या माजी नगरसेवकांची उमेदवारी कट केली. भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते भास्करराव देशपांडे, प्रा. जगदेवराव बाहेकर यांच्या मुलांना (उदय देशपांडे , पद्मनाभ बाहेकर) उमेदवारीपासून वंचित ठेवले. शिवाय त्यांच्या प्रचार यंत्रणेत भाजपची फारशी टीम दिसून आली नाही. त्यामुळे जेवढ्या मतांची आघाडी माजी नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांनी घेतली. तेवढी मतेदेखील विजयराज शिंदे यांना भाजपला मिळवून देता आली नाही. शिवाय त्यांनी उमेदवारी नाकारलेले माजी नगरसेवक उदय देशपांडे यांच्यासह भाजपाचे अनेक तरुण कार्यकर्ते आमदार गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झाले.
माजी आमदार शिंदे यांचे निवडणुकीमध्ये संपूर्ण लक्ष बुलढाणा शहरात असल्याने त्यांना जिल्ह्यातही इतर ठिकाणी भाजपसाठी काही करण्याची सवड मिळाली नाही. शहरात केवळ 2 नगरसेवक निवडून आले तेदेखील स्वबळावरच आले. त्यामुळे पक्ष नगरपालिकेत भुईसपाट झाला. मोजके शिल्लक असलेले कार्यकर्ते सोडून गेले. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात जरी भाजप नंबर वन असली तरी बुलढाणा नगरपालिकेच्या नकाशावर भाजप शून्यगत झाली असे म्हणता येईल.
बुलढाणा जिल्ह्यात भाजपकडे ॲड. आकाश फुंडकर यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले अशी तगडी फौज असताना गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने बाहेरून आलेले किंवा राजकीय वजन नसलेले जिल्हाध्यक्ष केले. या माजी जिल्हाध्यक्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीमार्गे भाजपात आलेले माजी आमदार सावळे, जिल्हाभर फारसा जनसंपर्क नसलेले डॉ. गणेश मान्टे व आता शिवसेना वंचितमार्गे भाजपमध्ये आलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपविली. म्हणून प्रश्न पडतो की केंद्रात आणि राज्यात पॉवरफूल नव्हे ओव्हरपॉवर असलेल्या भाजपला जिल्हाध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार का मिळू नये?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.