
Vinay Sahasrabuddhe criticizes Congress for accusing BJP of imposing an undeclared emergency -'भाजपा आणीबाणीवर फक्त कांगावा करीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते.' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे हे सर्व आरोप भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी फेटाळून लावले आहेत.
'आज सर्वजण मोकळेपणाने मत व्यक्त करीत आहेत, सरकारवर आरोप करत आहेत. यावरून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम आहे हे दिसते.' याकडे लक्ष वेधून त्यांनी देशात अघोषित आणीबाणी लादल्याचा विरोधकांच्या आरोपांना सहस्रबुद्धे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
आणीबाणीस ५० वर्षे झाल्यानिमित्त भाजपच्यावतीने आणीबाणीच्या काळातील दाहकता आणि संविधानाची कशी मोडतोड काँग्रेसने केली, हे सांगण्यासाठी विनय सहस्रबुद्धे यांच्या व्याख्यानचा कार्यक्रम बुधवारी नागपूरमध्ये आयोजित केला होता.
तत्पूर्वी पत्रकारांसोबत संवाद साधताना ते म्हणाले, इंदिरा गांधी यांना सर्व अधिकार आपल्या हाती घ्यायचे होते. संजय गांधी प्रशासकाप्रमाणे आदेश सोडत होते. याकरिता संविधानात अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या. जन्माच्या आधारावर उच्चनिचता जपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो देशातील नागरिकांनी हाणून पाडला. तसेच, आणीबाणीच्या कार्यकाळात इंदिरा गांधी यांनी लोकसभेचा कार्यकाळ पाच ऐवजी सहा वर्षांचा केला होता, ही संविधानाशी छेडछाड नव्हती का? असा सवाल त्यांनी काँग्रेसला केला.
याचबरोबर, आज सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरुद्ध ईडी, सीबीआय यासारख्या तपास यंत्रणामार्फत करावाई केली जाते, त्यांना तुरुंगात टाकले जाते, ही अप्रत्यक्ष आणीबाणी नाही का? या प्रश्नावर मात्र सहस्रबुद्धे यांनी कायदा आपले काम करतो आणि तपास यंत्रणा स्वायत्त आहेत असे उत्तर दिले.
याशिवाय, काँग्रेसने आणीबाणी लादून घृणास्पद प्रयोग केला होता. आपल्या कुटुंबाची मक्तेदारी कायम राहावी यासाठी इंदिरा गांधी यांनी कारस्थान रचले होते. यास विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबले होते. या घटनेस ५० वर्ष झाले आहे. हा काळा दिवस फार पूर्वीपासून साजरा करायला हवा होता. असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, भारतीयांचे सर्व अधिकार हिसकावून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा हल्ला होता. आज ही परिस्थिती नाही. प्रत्येकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे, याकडे लक्ष वेधून त्यांनी भाजप सरकारवर अघोषित आणीबाणीचा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांची टीकाही निरर्थक असल्याचे सांगितले.
(Edited by mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.