
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देऊन जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या नावांची पडताळणी केंद्रीय पातळीवर केली जात आहे. अशातच माजी मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल, असे सांगून आपले नाव रेटले आहे. याबाबत पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी याला दोनच शब्दात उत्तर देत बगल दिली आहे. यामुळे राष्ट्रीय नेतृत्वाने पटोले यांच्याकडे विचारना केल्यास ते राऊतांचे नाव सांगणार का? असा सवाल अनेकांच्या मनात उभा झाला आहे.
राज्यात पक्षनेतृत्वावरून सध्या जोरदार रस्सी खेच पाहायला मिळत आहे. सध्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी काही नावे चर्चेत आली आहेत. ज्यात माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपले नाव रेटलं आहे. यावरून पटोले यांना ते त्यांचे नाव पक्षश्रेष्ठिंना सुचवणार का असा सवाल करण्यात आला होता. यावरून त्यांनी, तशी विचारणा राष्ट्रीय नेतृत्वाने केल्यास आपण राऊतांचे नाव सांगू, असे म्हणत हा विषय संपवला.
यामुळे आता पटोले आणि राऊत नागपूरमध्येच राहात असले तरी ते त्यांचे नाव सुचवणार का अशी शंका निर्माण होत आहे. कारण पटोले आणि राऊत यांच्यात फार सलोख्याचे संबंध नसून राऊत पटोले यांच्या कंपूमध्येसुद्धा राऊत वावरत नव्हते. विशेष म्हणजे मतदानाच्या वाढलेल्या आकडेवारीवर काँग्रेसला शंका आहे. महायुतीचा विजय याच आकेडवारीमुळे झाल्याचे ठाम मत काँग्रेसचे आहे.
राहूल गांधी यांनी हा प्रश्न लोकसभेतही उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या पराभूत झालेल्या सुमारे शंभर उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेसच्या या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. याकरिता केंद्रीय नेत्यांची ‘ईगल' समिती स्थापन केली आहे. या समितीत महाराष्ट्रातून नितीन राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. नितीन राऊत यापूर्वी काँग्रेसच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष होते.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांना महत्त्वाचे ऊर्जा खाते देण्यात आले होते. ते नागपूरचे पालकमंत्रसुद्धा होते. त्यावेळी नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. प्रदेशाध्यक्ष स्वीकारायचे असल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पटोले यांना सोबतच मंत्रीसुद्धा व्हायचे होते. त्यावेळी राऊत यांना विधानसभेचे अध्यक्ष करून त्यांचे ऊर्जा खाते नाना पटोले यांना देण्यात येणार असल्याचा जोरदार चर्चा सुरू होत्या.
मात्र काँग्रेसच्यावतीने अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडे फारसा आग्रह करण्यात आला नाही आणि दबावही टाकण्यात आला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांचा पराभव झाला. नाना पटोले हेसुद्धा थोडक्यात बचावले.
मात्र नितीन राऊत हे आपल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या फरकांनी निवडूण आले आहेत. ते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळातसुद्धा मंत्री होते. सध्या काँग्रेसच्यावतीने संविधान बचावाचा विषय हाती घेतला आहे. यातच दलित समाजाच्या राऊत यांना प्रदेशाध्यक्ष करून काँग्रेस भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.