Shiv Sena News : शिवसेनेला पहिली सत्ता मिळून देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेवर आजही शिवसेनेच्याच धनुष्य बाणाचे वर्चस्व आहे. परंतु हे धनुष्यबाण आता ठाकरे यांच्याकडे नसून ते एकनाथ शिंदे यांच्या हाती आहे. शिंदे यांनी 67 नगरसेवकांपैकी 63 नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात मोठे यश मिळवले आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सेनेकडे अवघे चार नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे पुन्हा ठाणे महानगरपालिकेची सत्ता ठाकरे यांना आपल्या ताब्यात ठेवायची असेल तर शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 63 नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे वळवून घेण्यासाठी ' या नगरसेवकांनो ‘परत फिरा रे...' जणू अशी सादच घालावी लागणार आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षात बंडखोरी करून भाजपसोबत जाण्याचा मार्ग पत्करला होता. त्या निर्णयामुळे आज ते भाजपच्या मदतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहे. एवढेच नाही तर त्यांनी शिवसेना पक्ष आणि पक्षाची निशाणी धनुष्यबाण सुध्दा आपल्याकडे आणण्यात मोठे यश मिळवले आहे. त्यामुळेच राज्यभरातील आगामी सर्व निवडणुकांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून येणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यातूनच ठाणे महानगरपालिकेकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांचे एक भावनिक नाते आहे. निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे घराण्यावर नेहमीच अलोट प्रेम केले आहे. मात्र, आता पक्षात मोठी बंडखोरी झाल्याने हा निष्ठावंत समजला जाणारा शिवसैनिक कुणासोबत राहतो हे येणाऱ्या राज्यभरातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये दिसून येणार आहे. यापैकी ठाणे महानगरपालिकेकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. 2017 मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 67 नगरसेवक निवडून आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 34, भाजप 23, काँग्रेसचे (Congress) तीन आणि इतर चार नगरसेवकांना ठाणेकरांनी निवडून दिले होते. त्यासाठी सुमारे साडेअठरा लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
वर्षभरापासून ठाणे महानगरपालिकेचा कारभार प्रशासनाच्या हातात आहे. कोरोनामुळे लांबलेली निवडणूक अद्याप पार पडलेली नाही. 2022 मध्ये ही निवडणूक होणे अपेक्षित होते. त्यामुळे 2017 मध्ये निवडून आलेले महानगरपालिकेतील सर्व म्हणजे 131 नगरसेवक माजी झाले आहेत. आता नव्याने होणाऱ्या निवडणुकीसाठी हे सर्व माजी नगरसेवक सज्ज होणार आहेत. शिवसेना, भाजप (BJP), रिपाइं (आठवले) या पक्षाची महायुती असल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडणुकीत एकत्रितपणे उतरतात इतकी वेगवेगळे लढतात हे येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होईल. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रित लढते की स्वतंत्रपणे हेदेखील तेव्हाच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात सुद्धा बंडखोरी झाली आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केलीय. या बंडखोरीनंतर ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी ठाण्यातील तीन माजी नगरसेवकांसह अजित पवार यांचा हात धरला आहे.
तर शरद पवारांसोबत राहणाऱ्या आमदार आव्हाड यांच्यासोबत ठाण्यातील 31 माजी नगरसेवक राहिले आहेत. त्यातील अनेक नगरसेवक अजितदादा पवार यांच्या संपर्क साधून आहेत, असा नजीब मुल्ला यांचा दावा आहे. त्यामुळे हे नगरसेवक अजित पवारांच्या गटात जाऊ नयेत यासाठी आव्हाड यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर 2017 मध्ये निवडून येऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेल्या त्या 63 माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना 'या नगरसेवकांनो परत फिरा रे...' अशी साद घालवी लागणार असे दिसते.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.