मुंबई : प्रजासत्ताक दिनी (Republic Day) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी झालेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी ध्वजाला सलामी न देता शिष्टाचाराचा भंग केला, अशी तक्रार फोटोच्या आधारे थेट लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा असाच फोटो समोर आला आहे.
किरीट सोमय्या यांनीच हे छायाचित्र टाकले आहे. विशेष म्हणजे, यात किरीट सोमय्या हे ध्वजाला सलामी देताना दिसत नाहीत. याचवेळी इतर उपस्थित सर्वजण सलामी देताना दिसत आहेत. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयातील हा फोटो आहे. सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झालो. रश्मी ठाकरे यांच्या विरोधात फोटोच्या आधारे तक्रार करण्यात आल्यानंतर आता सोमय्या यांचा फोटो आणि ट्विटही व्हायरल होऊ लागले आहे. रश्मी ठाकरे यांच्याप्रमाणे सोमय्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली जाणार का? त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? अशी विचारणा सोशल मीडियावर केली जात आहे. यामुळे सोमय्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, रश्मी ठाकरे यांनी ध्वजाचा अवमान केल्याचा मुद्दा अॅ़ड. जयश्री पाटील (Jayashri Patil) यांनी उपस्थित केला. ध्वजारोहणाच्या समारंभातील फोटोवरून त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुख्यमंत्री ठाकरे 26 जानेवरीला सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. मानेवरील शस्त्रक्रियेनंतर ते पहिल्यांदाच घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
अॅड. पाटील यांनी याच फोटोवरून रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार लोकायुक्तांकडे केली आहे. फोटोमध्ये मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरे राष्ट्रध्वजाला सलामी देताना दिसत आहे. पण, रश्मी ठाकरे यांनी सलामी दिली नाही, असे फोटोत स्पष्टपणे दिसते. हाच मुद्दा पाटील यांनी तक्रारीत उपस्थि केला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांसोबत रेड कार्पेटवर उभे करण्यात आल्याने शिष्टाचाराचा भंग केल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या सलामी देताना दिसत नाहीत. त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का, असा सवाल पाटील यांनी तक्रारीत केला आहे. ध्वजसंहितेचा अवमान म्हणजे भारतीय नागरिकांच्या भावनांचा अपमान करण्यासारखी ही कृती आहे. रश्मी ठाकरे यांनी अक्षम्य अपराध केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पाटील यांनी तक्रारीत केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.