
Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मित्रपक्षांची डोकेदुखी होऊ नये म्हणून राजकीय चक्रव्यूह रचलं आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यात अडकवून ठेवण्याची भाजपची रणनीती लपून राहिलेली नाही. नाराज एकनाथ शिंदे यांना अधिकाधिक ठाण्यात कसे घेरता येईल, यासाठी भाजपने (BJP) वनमंत्री गणेश नाईक यांना ठाण्याच्या संपर्कमंत्रीपदावर नेमलं आहे.
गणेश नाईक यांनी ठाण्यात घेतलेल्या पहिल्याच जनता दरबाराला प्रतिसाद मिळाला. यातच या दरबाराला हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मदतनीस चंपासिंह थापा यांनी हजेरी लावली. त्यामुळे गणेश नाईक यांचा हा जनता दरबार अधिकच चर्चेत आला.
चंपासिंह थापा हे हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विश्वासू सहायक अशी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई यांचे निधन झाल्यानंतर थापा हे बाळासाहेबांची सावली झाले. बाळासाहेब ठाकरेंसोबतचा चंपासिंह थापा यांचा मदतनीस होण्याचा प्रवास वेगळाच आहे.
चंपासिंह थापा चार-पाच दशकांपूर्वी नेपाळमधून भारतात आले होते. गोरेगावमध्ये इथं राहत असताना, भांडूपमधील नगरसेवक के. टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा 'मातोश्री'वर गेले. बाळासाहेबांनी यानंतर त्यांना 'मातोश्री'वर थांबवून घेतले. यानंतर थापा 1980-85 पासून बाळासाहेब ठाकरे यांचे खास विश्वासू मदतनीस झाले.
चंपासिंह थापा यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा दिनक्रम सांभाळण्यापासून ते त्यांच्या सेवेत वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा, जाहीर सभांमध्ये चंपासिंह थापा त्यांच्या सावलीसारखे असायचे. यातूनच थापा यांनी नेपाळमध्ये शिवसेना शाखा सुरू केली.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर चंपासिंह थापा यांना आपल्या बाजूने करून घेतले. यानंतर थापा चर्चेत नव्हते. परंतु भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात घेतलेल्या जनता दरबाराता चंपासिंह थापा यांनी हजेरी लावली अन् पुन्हा ते चर्चेत आले. चंपासिंह थापा यांची गणेश नाईक यांच्या जनता दरबारातील हजेरी खूप काही सांगून जाणारी ठरते.
ठाणे जिल्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. परंतु भाजपने संपर्कमंत्रीपद निर्माण करत शिंदेंचे कट्टर प्रतिस्पर्धी वनमंत्री गणेश नाईक यांना तिथं नेमलं आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण भाजप पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. त्यामुळे ठाण्यात आगामी काळात भाजप पकड मजबूत करणार असल्याचे हे संकेत आहेत. यातून फक्त शिंदेंची राजकीय कोंडीचा हा प्रकार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मुंबईनंतर सर्वाधिक औद्योगिकरण, नागरीकरण ठाणे जिल्ह्यात होत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर या दोन नगरपालिका ठाणे जिल्ह्यात आहेत. याशिवाय एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून दीड ते दोन लाख कोटींची विकासकामे जिल्ह्यात सुरू आहेत. ठाण्यातील महापालिकांचे बजेटही तीन ते पाच हजार कोटींवर आहे. या सर्वांवर भाजपचे संपर्कमंत्रीपदाच्या माध्यमातून लक्ष राहणार आहे. एकप्रकारे ठाणे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्याची जबाबदारी चव्हाण आणि नाईक यांच्यावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.