

Mira-Bhayandar News: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. मंगळवारी(ता.30)उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या पार्श्वभूमीवरच निवडणुकीच्या रिंगणात उतरताना उमेदवारी जाहीर झालेल्या वा पत्ता कट झालेल्या अशा सर्वच उमेदवारांनीही अपक्ष किंवा पक्षांतर करत अर्ज दाखल केले आहेत. यावेळी राज्यात विविध ठिकाणी उमेदवारी नाकारल्यामुळे इच्छुकांमध्ये संतापाची लाट उसळली. कुठे राडा,आंदोलनं,बाचाबाची, 'ना'राजीनामे यांसह पक्षांतराच्या घटनांनी राजकारण ढवळून निघाल्याचं दिसून आलं.पण याचदरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांपैकी 14 निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती तुटल्याचं समोर आलं आहे. भाजपकडून (BJP) तिकीट मिळावं यासाठी पक्षातील निष्ठांवंतांसह आयारामांनीही देव पाण्यात ठेवले होते. उमेदवारीच्या यादीकडे आस लावून बसलेल्यांना भाजपनं उमेदवारांची नावं जाहीर करताच मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे राजकारण चांगलंचं तापलं. काहींनी पक्षांवर पैसे घेऊन बाहेरच्यांनी तिकीटं वाटल्याचा आरोप केला, तर काहींनी पक्षांसाठी काम केल्याचं चांगलं फळ मिळालं अशी खंत बोलून दाखवली. तर काही ठिकाणी बंडखोरीही पाहायला मिळाली.
आता मिरा-भाईंदरमध्ये निवडणुकीच्या धामधूमीतच एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठी धावपळ उडाली.मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी भाजपकडून श्रद्धा बने यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र, आता पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं. हा धक्का सहन न झाल्यामुळे श्रद्धा यांच्या आई व माजी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला.
वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तत्काळ मीरा रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.काही तास उपचार केल्यानंतर त्यांचा धोका टळला. आता त्यांची प्रकृती आत्ता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. याघटनेची माहिती मिळताच बने यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयाकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Mahapalika Election) महायुतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं भाजपसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर स्वबळाचा नारा दिला.तसेच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना मान्य केलेल्या 13 जागांचे जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र नवी मुंबईचे निवडणूक प्रभारी डॉ.संजीव नाईक यांनी जाणून-बुजून जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश पाटील यांना गायब केले असल्याचा आरोपही म्हात्रे यांनी केला. अशा परिस्थितीत नाईकांनी महापालिकेच्या 111 जागा जिंकून आणून दाखवावं असं आव्हानच थेट म्हात्रे यांनी नाईकांना दिलं.
काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत चर्चा सुरु असताना मंदा म्हात्रे यांनी आपले गणेश नाईकांसोबत असणारे राजकीय वैर संपल्याचं जाहीर केलं होतं. तसेच हे दोन्ही नेते आपआपल्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचं बोललं जात होतं.भाजपतर्फे नवी मुंबई महापालिकेवर प्रभारी म्हणून डॉ.संजीव नाईक यांना जबाबदारी दिली आहे.
संजीव नाईक यांच्यासोबत म्हात्रे यांची रोज जागावाटपांबाबत चर्चा सुरु होती.काल झालेल्या चर्चेनंतर म्हात्रे यांना 13 जागा देणार असल्याचे आश्वासन संजीव नाईक यांनी दिले होते. त्यासाठी म्हात्रे यांना 13 जागांकरीता एबी फॉर्म देण्यात आले होते.पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत त्या सर्व एबी फ़ॉर्मवर सह्याच न झाल्यामुळे मोठा वाद पेटला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.