Devendra Fadnavis News : "आम्ही कोणत्याच धर्माचा तिरस्कार करत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा सनातन धर्मावर संकट येईल तेव्हा त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे काम हे सरकार निश्चितपणे करेल," असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर भूमी संघर्षाला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सागाव येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात भगवान शंकराची महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, राजेश मोरे, माजी आमदार सुभाष भोईर, कपिल पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिराच्या व्यापक विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या २६ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत मंदिर ट्रस्टला तब्बल ४ एकर २५ गुंठे जमीन नाममात्र दरात देण्याचा तसेच सध्या वापरात असलेल्या जमिनीचे नियमितीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिर परिसरात मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेत संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंदिराच्या भूमीसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देत राज्य सरकार व मंत्रिमंडळाचे आभार मानले. तसेच दत्त मंदिर आणि मलंगगड मुक्तीचे प्रलंबित प्रश्नही महायुती सरकारने मार्गी लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मंदिर भूमी संघर्षाचा उल्लेख करताना सांगितले की, कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढत्या जमीनमूल्यांमुळे अनेकांच्या नजरा या जागेवर होत्या. मंदिराची जमीन बळकावण्याचे प्रयत्नही झाले. मात्र महादेवाच्या भक्तांनी हा संघर्ष यशस्वी केला. "त्यावेळी रवींद्र चव्हाण मंत्री होते. त्यांनी हा विषय सातत्याने पाठपुरावा करून पुढे नेला. मधल्या काळात सरकार बदलल्याने प्रक्रिया थांबली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सत्तेत आल्यानंतर हा विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर विजय मिळाला," असे फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या भूमिकेचाही पुनरुच्चार केला. "आमचे सरकार सनातन धर्माचा पुरस्कार करणारे सरकार आहे. आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करत नाही. मात्र सनातन धर्मावर संकट आले तर त्याच्या संरक्षणासाठी सरकार ठामपणे उभे राहील," असे ते म्हणाले.
तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.