

Voting day controversy : राज्यभरात २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू असून शाई पुसणे, बोगस मतदान, ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड अशा अनेक तक्रारी येत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांकडून थेट निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मतदान सुरू असतानाच पत्रकार परिषद घेतली.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेत अनेक बाबींचा खुलासा करावा लागला आहे. मतदान सुरू असतानाच आयुक्तांकडून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी आयुक्त वाघमारे यांनी मतदानादरम्यान निर्माण झालेल्या वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
प्रामुख्याने विरोधी पक्षांनी मतदारांच्या बोटांवरील शाई सहजपणे पुसली जात असल्याचे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत त्याचे व्हिडीओ दाखविले. तसेच ही शाई पुसली जात नसून लोकशाही पुसली जात असल्याचा आरोपही केला. आयोग सत्ताधारी पक्षांना मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्षातील नेत्यांकडून सुरू असलेल्या या आरोपांवर वाघमारे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणाऱ्या शाईचा आणि पेनचा वापर २०११ पासून केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही याच शाईचा वापर केला जात आहे. हे पेन एकाच कंपनीचे आहेत. आमचे सचिव आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही मतदान केले त्यांची शाई पुसली नाही. शाई सुकण्यासाठी १० ते १२ सेंकद लागतात. शाई सुकल्यानंतर ती निघत नाही.
ठाकरेंच्या आरोपांवर बोलताना वाघमारे यांनी हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा पलटवार केला. शाई पुसली जात असल्याचे व्हिडीअ कुठून आले हे माहिती नाही. पण त्याची चौकशी केली जाईल. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. शाईबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
बोगस मतदारांबाबत आमच्याकडे आतापर्यंत एकच तक्रार आली आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याबाबत कारवाई केली आहे. तसेच सोशल मीडियातून जे व्हिडीओ समोर येत आहेत, त्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
मतदारयाद्यांमध्ये नाव नसणे, मतदान केंद्र बदलल्याच्याही तक्रारी येत आहेत. मंत्री गणेश नाईक यांनाही त्याचा फटका बसला. त्यावर बोलताना वाघमारे यांनी ही मतदारांचीच जबाबदारी असल्याचे सांगितले. गणेश नाईक हे चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. मतदारांचीही जबाबदारी आहे. मतदानाआधी त्यांनी मतदान केंद्राची, मतदानयादीत नाव असल्याची खात्री करायला हवी, असे वाघमारे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.