
Ganeshotsov 2025: महाराष्ट्रातील सार्वजनिक गणोशोत्सवाला महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून अधिकृतरित्या मान्यता देण्याची घोषणा सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली. त्यामुळं आता यासाठी निधी, विविध उपाययोजना आणि निर्बंध दूर करण्याबाबतचे महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी सभागृहात मागणी केली होती. या मागणीला अनुसरुन आशिष शेलार यांनी ही घोषणा केली.
यासंदर्भात पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून घोषित करावं आणि यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली होती. रासने यांनी म्हटलं की, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतीक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. याची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून त्याला व्यापक जनआधार आहे, त्यामुळं या उत्सवाला महाराष्ट्र राज्याचा उत्सव म्हणून अधिकृत मान्यता देणं आवश्यक आहे. १८९६ साली लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात स्वराज्याच्या निर्मितीसाठी समाज संघटीत करण्यासाठी केली. या गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश हा वर्षभर चालणाऱ्या विधायक सामाजिक कार्याच्या माध्यमातून गणेशोत्सव आणि अनेक चांगले सामाजिक, राजकीय कार्यकर्ते घडवले आहेत.
या उत्सवानं धार्मिक सांस्कृतीक परंपरा जपल्या तसंच समाज प्रबोधनही केलं आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणारे, वैज्ञानिक देखावे कार्यकर्ते रात्रंदिवस झटून सादर करतात. हा उत्सव आत्ताच्या निर्बंधामुळं कुठेतरी निर्बंध आले आहेत. यामुळं कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते, त्यामुळं हा उत्सव पुणे शहरात २४ तास चालणं आवश्यक आहे. कारण यापूर्वी हा उत्सव २४ तास समाजासाठी उपलब्ध होता.
पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळं या उत्सवासाठी जादा कुमक देणं गरजेचं आहे. तसंच ज्या प्रमाणं G20 परिषदेच्या दरम्यान पुणे शहर सजवण्यात आलं होतं त्याचप्रमाणं सजावट गणशोत्सवाच्या काळात पुणे शहरात अपेक्षित आहे. पंढरपूरच्या वारीत राज्य शासनानं जे व्यवस्थापन केलं होतं त्याच धर्तीवर पुणे शहरात उत्सवाचं नियोजन करणं गरजेचं आहे. यासर्व कामांसाठी राज्य शासनानं गणेशोत्सवासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा," अशी मागणीही यावेळी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे.
दरम्यान, रासने यांच्या मागणीला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, "गणेशोत्सव आता जवळच आला आहे त्यामुळं मी आत्ताच यावर स्पष्टीकरण देतो की, महाराष्ट्राचा गणेशोत्सव १८९३ रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरुपात सुरु केला. त्यापूर्वी तो घरगुती स्वरुपात सुरु होता. त्याची पार्श्वभूमी म्हणजे सामाजिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्य, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्याशी संबंधित होता आणि आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल असं मी स्पष्ट करतो.
देशभरात ज्या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रकृती आणि प्रचार यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील. गणेशोत्सवावर जे निर्बंध आले आहेत त्यानुसार, काही लोकांनी वेगवेगळ्या कारणांनी या सर्व गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवावर बाधा निर्माण होण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात केला. पण महायुतीचं सरकारनं या सगळ्या निर्बंधांना आणि या स्पीडब्रेकर्सना बाजुला करण्याचं काम शीघ्रतेनं काम केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.