मुंबई : ''आज शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होईल. कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. तुमच्या छाताडावर बसून पुन्हा मुंबई जिंकूच, अशा शब्दांत शिवसेनेने सामना अग्रलेखातून शिंदे गटाला जणू इशाराच दिला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा आ शिवतीर्थावर होत आहे. त्याआधी राज्यातील गेल्या तीन महिन्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत शिवसेनेने शिंदे सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा आसुड ओढला आहे.
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट होणार
भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. 'खोके'वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? जेथे धर्म तेथे जय! शिवतीर्थाच्या रणमैदानावर धर्म आहे! त्यामुळे जय नक्की आहे! असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केलाय.
महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल?
रुपयाची किंमत मातीस मिळाली, महागाई वाढली, बेरोजगारी वाढतच आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे व त्यावर उपाय काय, तर यापुढे ‘हॅलो’ म्हणायचे नाही, तर ‘वंदे मातरम्’ म्हणा! ही मातृभूमी आमचीच आहे. त्या मातृभूमीपुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत, पण ही भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् कधी होणार? चीन फक्त लडाखच्या सीमेवर नाही, तर अरुणाचलातही घुसला आहे. त्यांना धडा कधी शिकविणार? ‘वंदे मातरम्’चा हाच खरा अर्थ आहे. महाराष्ट्राला मोडून, कमजोर करून ‘वंदे मातरम्’ची गर्जना कशी करता येईल? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे
शिवसेनेला शिवाजी पार्क मिळू नये यासाठी कारस्थाने
दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेबांचे शिवतीर्थ मिळू नये यासाठी कारस्थाने झाली. शेवटी न्यायालयाने न्याय केला. ज्या शिवाजी पार्कवरून शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचे, मराठी अस्मितेचे रणशिंग फुंकले, महाराष्ट्र जागा केला, एक बलाढय़ संघटन उभे केले त्या शिवतीर्थावरच शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईंनी केले. मात्र आता शिवसेनेच्या पुढील लढय़ाच्या नव्या पर्वाला सुरुवात पुन्हा एकदा शिवाजी पार्कच्याच या रणमैदानावरून होत आहे ही मोठी योगायोगाची गोष्ट आहे.
'पीएफआय'पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची
‘पीएफआय’सारख्या दहशतवादी विचारांच्या संघटनांचा बीमोड केला जात आहे, हे चांगलेच आहे. अशा प्रकारची विषवल्ली उपटून नष्टच केली पाहिजे. अशा कारवाया राष्ट्रहितासाठी आवश्यक ठरतात, पण कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ‘जैसे थे’ आहे. तेथील कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिल्लीला अस्वस्थ करू शकलेला नाही याचे दुःख आहे. ‘पीएफआय’पेक्षा भयंकर दहशतवाद ‘ईडी-सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी चालवला आहे. राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी या संस्था बेकायदेशीरपणे वापरल्या जातात तेव्हा देशात कायद्याचे राज्य आहे असे अजिबात म्हणता येत नाही
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.