
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जयंत पाटलांच्या संस्थेतील कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. ही चर्चा थांबत नाही तोच जयंत पाटलांसंदर्भात (Jayant Patil) मोठी माहिती समोर येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात सोमवारी (ता.24) रात्री आठ वाजता एक तास भेट झाली आहे. ही भेट बावनकुळे यांच्या बंगल्यावर झाली. तसेच या भेटीवेळी जयंत पाटील,बावनकुळे यांच्यासह एक केंद्रीय मंत्रीही उपस्थित असल्याचं बोललं जात आहे. या भेटीमुळे आता पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. आपण बावनकुळे यांंची भेट घेतल्याचंही जयंत पाटील यांनीही मान्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकदम अलिप्ततेच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच दुसरीकडे ते कोणत्याही घटनेवर व्यक्त होताना दिसत नसल्याचं पाहायला मिळालं आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी होऊ लागली आहे.त्याचमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोर धरू लागली आहे.
मुंबईतील भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर जयंत पाटलांसोबत बैठक झाल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि बावनकुळे आणि जयंत पाटील यांच्यात ही महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी आहे, ही बाब असल्याचेही सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही आपण भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यावेळी त्यांनी ही भेट आपण मतदारसंघातल्या विकासकामांसाठी घेतली असल्याचं सांगितलं आहे. तसेच या भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित असल्याचे सांगितले आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला तुमच्याद्वारेच ही माहिती समजत आहे. पण मागेही अधिवेशनावेळी मी याबाबत बोललो होतो. तेव्हा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या आणि वाद निर्माण झाला होता.पण एक गोष्ट निश्चित आहे की,काही दिवसांपूर्वी सांगलीतील त्यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या कार्यक्रमावेळी तिथे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी तिथे येऊन गेले.
तर त्यावेळीही त्यांची देहबोली ही तुतारी गटातील नेत्यांकडून होत असलेले अवमान असतील, वारंवार त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतील,अशा ठिकाणी जयंत पाटलांनी का राहायचं, आणि काल जर ते भेटले असतील, आणि कुणी जर म्हणत असतील ही राजकीय दृष्टीकोनातून ही भेट नसेल तरीही ती राजकीय भेटच असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असेही मिटकरी यांनी सांगितले.
यावर मेहबूब शेख म्हणाले,जयंत पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली की नाही याची मला अधिकृत माहिती नाही.पण बावनकुळे यांची जयंत पाटील यांनी जरी भेट घेतली असेल तरी ती मंत्री म्हणून आहे की, काही राजकीय कारणांनी ते बघावं लागेल. पण विरोधकांकडून नेहमीच जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठवण्याचं काम सुरू असतं. पण ते नेहमीच शरद पवार साहेबांसोबत असतील.तसेच ते पक्षात सक्रीय असल्याचंही शेख यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.