

Jayant Patil meets Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण काल रात्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तीन नेत्यांनी अचानक 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
या तिन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून शरद पवारांची राष्ट्रवादीतील काही लोक 'एनडीए'सोबत जाण्यासाठी अनुकूल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चा सुरू असतानाच आता जयंत पाटील तटकरे आणि पटेलांसोबत फडणवीसांच्या भेटीला गेल्यामुळे या चर्चांनी आणखी जोर धरला आहे.
दरम्यान, याच सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'आमचे नेते वर्षावर गेले असतील तर ते अर्थखात्यासाठी गेले असतील समजू शकतो, पण जयंत पाटील तिथे गेले म्हणजे काहीतरी ट्वीस्ट आहे राजकारणात, असं सूचक वक्तव्य मिटकरी यांनी केलं आहे. शिवाय या सर्व गोष्टी अकल्पित असून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वरच्या पातळीवरील गोष्टींचा थांगपताही नसतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यां संदर्भात साम टीव्हीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, "भेटीची माहिती मला मीडियाच्या माध्यमातून समजली. आता कोण वेटिंगवर आहे आणि कोण एकत्र आहे. हे कळेनासं झालंय. जयंत पाटलांना अर्थखातं मिळणार की आमचे जे दोन गेले आहेत त्यांना अर्थखातं मिळणार हे पण कळेना.
साहेबांच्या पक्षाला एनडीएत घेऊन यायचं आहे की, सीएम साहेब स्वतःकडे अर्थखातं ठेवणार? हेही न कळण्यासारखं आहे. मात्र, हे सर्व अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. कारण, रात्रीच्या वेळी अशी काही घडामोड होत असेल हे ते कल्पनेच्या पलीकडच आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते तिथे जात असतील तर आम्ही समजू शकतो की, अर्थखात्याच्या मागणीसाठी इतक्या रात्री गेले असतील, पण तिथे जयंत पाटीलसाहेब गेले आहेत म्हणजे हा आणखी एक नवीन ट्विस्ट आहे राजकारणामध्ये. त्यामुळे आता मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही.
शेवटी आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत पक्षांचे पक्षांच्या वरिष्ठांमध्ये काय खलबत होतात याचा थांगपत्ता आम्हाला नसतो," असं म्हणत त्यांनी या भेटीमागे काहीतरी मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत दिले. तर शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये जाणार अशा चर्चा सुरू असताना आणि राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा देखील चर्चेत असल्याने त्याबाबत फडणविसांसोबत चर्चा सुरू असेल. पण जर आमच्याच पक्षाचे नेते आणि जयंत पाटीलसाहेब तिथे गेले असतील तर ही चर्चा नक्कीच एनडीएमध्ये सहभागी होण्याकरता असेल.
शिवाय पवार साहेबांच्या पक्षाचे काही आमदार खासदार हे एनडीएसोबत जाण्यासाठी अनुकूल आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, असंही ते म्हणाले. तसंच कालच जयंत पाटील साहेबांनी काही कालच सर्व आमदारांची बैठक घेऊन आणि आज खासदारांची बैठक घेऊन त्यांच मत जाणून घेतल्याच मला समजलं आहे. त्यामुळे या सर्वांचा निरोप घेऊन ते तिथे गेले असतील, अशी शक्यताही मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.