
Maharashtra local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारण तीन वर्षांपासून रखडल्यात. सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करत चार महिन्यांत निवडणुका घ्या, असा आदेश राज्य सरकारला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांची एवढी मोठी बातमी समोर आल्यानंतर इच्छुक देखील तयारीला लागलेत.
महायुती अन् महाविकास आघाडी निवडणुकीला कसं समोरं जाणार, याची उत्सुकता असतानाच, राज्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. राजकीय संघर्षात ही मुंबई निवडणूक एकतर्फी होणार नाही, एवढ मात्र निश्चित! त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीचा भवितव्य अवलंबून असणार आहे.
मुंबई महापालिका कोणाची? याचं उत्तर आता गणेशोत्सवानंतर होणाऱ्या निवडणुकांमधून मिळेल. तत्पूर्वी राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा परिमाण पाहायला मिळेल, असे संकेत आहेत. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका महायुती अन् महाविकास (MVA) आघाडीला सोप्या नसणार आहे, हे आता कळू लागलं आहे.
राज्यात सध्या भाजपला (BJP) वातावरण अनुकूल आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला महायुती म्हणून समोरं जाणार असल्याचं सांगितलं, असलं तरी, एखाद्या वेळी स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय होऊ शकतो, असे संकेत दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया महायुतीमधील मित्र पक्षांसाठी बरचं काही सांगून जाते. भाजपने एकप्रकारे महायुतीमधील मित्र पक्षांसमोर सर्व पर्याय खुले ठेवल्याचे दिसते.
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून उत्सुक आहे. लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीत भाजपने केलेले राजकीय प्रयोग बरचं काही सांगतात. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप मोठी ताकद खर्ची करण्याच्या तयारीत आहे. महायुतीत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या स्वरुपात शिवसेनेला बरोबर घेतलं. शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून बरोबर असले, तरी सत्तेच्या भुकेपुढे भाजप त्यांना कितपत बरोबर ठेवले, याची सांशकताच आहे.
अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत भाजपबरोबर असली, तरी या पक्षाची ताकद मुंबईत म्हणावी तेवढी नाही. मुंबईतील मोजक्यात पट्ट्यात काँग्रेसची ताकद दिसते. परंतु तिथं संघटन नसल्यानं, काँग्रेसची पिछेहाट दिसते. समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांचे संघटन विखुरल्या गत आहे. त्यामुळे मुंबईत महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय संघर्ष दिसेल, तो भाजपविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात! यात संघर्षात मनसे मात्र निर्णयाक टाळी देण्याच्या भूमिकेत आज तरी दिसतोय.
मुंबईत सत्ता मिळवताना भाजपचा संघर्ष ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मैदानात उघडपणे अधिक होईल. तसा तो दिसू देखील लागला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जागा वाटपात सर्वाधित संघर्षाची चिन्हं आहेत. तो जागा वाटपात दिसेल. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेची सत्ता पाहिजे, त्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेकडे देखील चाचपणी करताना सर्व पर्याय खुले ठेवले आहे. परंतु अलीकडच्या काळात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकमेकांना युतीच्या टाळ्या देऊ लागलेत. मनसे कोणाबरोबर जाणार हे अजून स्पष्ट नाही. मनसे गुंगारा देईल, याची शक्यता गृहीत धरत भाजपने इतरत्र पर्याय देखील पडताळून पाहू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईत मराठी माणसांचा मुद्दा पुन्हा तापला आहे. शिवसेनेचा जन्म मराठी माणसांच्या अस्मितेवर झालाय. मनसे या मुद्यावर आक्रमक आहे. हाच मुद्दा भाजप मुंबईपुरता का होईना हेरण्याच्या तयारीत आहे. त्यावर भाजपकडून काम सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळते. याच मुद्यावर ठाकरे शिवसेना अन् मनसे एकत्र, आल्यास मुंबई महापालिका निवडणुकीत राजकारणाचा वेगळा पोत दिसेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
महायुतीच्या आडून राज्य सरकारद्वारे सत्ताधारी भाजपने नवीन शैक्षणिक धोरणाच्या आडून अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती केली होती. त्यावरून मनसे आक्रमक झाली. ठाकरेंच्या शिवसेनेने देखील भाजपच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. हिंदी भाषेचा मुद्दा अंगलट येताच, महायुती सरकारने त्यातील'अनिवार्य' हा शब्द काढून घेत, हळूच माघार घेतली. मनसेनं भाजपचं हिंदुत्वाबरोबर दिसते. ठाकरे शिवसेनेला नव्याने जोडला गेलेला मुस्लिम मतदान मनसेमुळे लांब जाण्याची शक्यता आहे. या मुद्याचा प्रभाव कमी करण्याची ताकद, ठाकरे शिवसेना-मनसेच्या दोन्ही प्रमुखांमध्ये आहे, हे देखील भाजपला माहिती आहे.
केंद्रात अन् राज्यात भाजपची सत्ता आहे. गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेला भाजपची संघटनात्मक ताकद राज्यात मोठी आहे. लोकसभेला बॅकफूटवर गेलेली भाजप विधानसभा निवडणुकीत वेगानं पुढं आली. परिणामी राज्यात महायुती मोठं यश घेत सत्तेत विराजमान झाली. सत्तेत असलेली भाजप राज्यात हिंदुत्वाचं कार्ड आराम खेळताना दिसते. गेल्या दहा ते बारा वर्षांत भाजपने आपल्याबाजूने अनुकूल, असं वातावरण ठेवण्यात यश मिळवल्याचे दिसते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपचा तोच प्रयत्न असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्षांबरोबर विरोधकांना देखील भाजप आव्हान देण्याच्या तयारीत दिसेल, असे राजकीय विश्लेषणकांचे निरीक्षण आहे. यासाठी मुंबई महापालिकेत, सत्ता मिळवण्यासाठी भाजपच आक्रमक दिसेल.
आगामी काळात युती, आघाड्यामध्ये काय घडामोडी होतात, त्यावर मुंबई महापालिका निवडणुकांचे निकाल अवलंबून असणार आहे. या निवडणुका एकतर्फी आहे, असे म्हणता येणार नाही. भाजपने इतर सर्व पक्षांना राज्यात कमकुवत केलं आहे. महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना दुय्यम स्थान आहे. मुंबईत शिवसेनेचा भाजपला किती उपयोग होईल, यावर अनेक पालिकेची गणिते अवलंबून आहेत. गेल्या पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये फारसे अंतर नव्हते. या वेळी मुंबई पालिका जिंकण्यासाठी भाजप सर्व शक्तीपणाला लावेल, यात काही शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.