
Mumbai News : भाजप आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी या बैठकीत आमदारांना संबोधित केले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मंत्रिपदाची स्वप्न पाहणाऱ्या आमदारांना सावध केले आहे.
महायुतीमध्ये तीन पक्ष असलेल्याने कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी नेत्यांना साकडं घातलं आहे. यापार्श्वभूमीवर फडणवीस यांनी भाजप आमदारांना गटनेतेपदी निवड होताच मोलाचा सल्ला दिला आहे. त्या काळात चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आणि चार गोष्टी मनाविरोधात होतील, असे विधान त्यांनी केले आहे.
बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, आपली प्राथमिकता आपण दिलेली आश्वासने आणि आणि आपण सुरू केलेल्या योजना पूर्ण करणे ही असेलच. पण त्यासोबत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला सातत्याने कार्यरत राहायचे आहे. 2019 मध्येही जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. दुर्दैवाने तो कौल हिसकावून घेण्यात आला. एकप्रकारे त्याकाळात बेईमानी झाली. मी त्याकाळात जाऊ इच्छित नाही.
आपण नवीन सुरूवात करत आहोत. सुरूवातीच्या अडीच वर्षात ज्याप्रकारे वेगवेगळ्या पध्दतीने आपले आमदार, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीत मला या गोष्टीचा अभिमान आहे की, अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही. सगळे आमदार, नेते संघर्ष करत होते. या संघर्षामुळेच 2022 मध्ये आपले सरकार तयार झाले आणि त्यातूनच पुन्हा एकदा महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. हा एकप्रकारचा इतिहास लिहिला गेला.
माझ्यासारख्या बुथच्या कार्यकर्त्याला सर्वोच्च पदापर्यंत तीनवेळा पंतप्रधान मोदींनी मला बसवले. अर्थात एकदा 72 तासांसाठीच होतो. तीनवेळा मला मुख्यमंत्रिपदावर बसण्याचा मान त्यांनी दिला. हा पक्ष ज्याप्रकारे मोदींच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं मिळाली, चांगली पदे मिळाली, काम करण्याची संधी मिळाली.
सर्वांचे आभार मानत असताना पुढची वाट ही आपल्याला अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्षांची आहे. आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये एकदिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं बहुमत असते तेव्हा सर्व गोष्टी सर्वांच्या मनाप्रमाणे होत नाही, असे फडणवीस म्हणाले.
आपण मोठा विचार घेऊन राजकारणात आलो आहोत. केवळ पदांसाठी, आपल्याला कुणीतरी मोठे करावे, यासाठी राजकारणात आलो नाहीत. त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे की, येत्या काळात चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे आणि चार गोष्टी मनाविरोधात होतील. पण एका ‘लार्जर इंट्रेस्ट’मध्ये आपण सगळे एकत्रितपणे काम करून आपली शक्ती काय आहे, हे आपण दाखवून देऊ, असा सल्ला फडणवीसांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.