Mumbai North West Lok Sabha Constituency: शिवसेना शिंदे गटात गेलेल्या निष्ठावंत गजानन कीर्तीकरांची परीक्षा!

Mumbai Political News : शिवसेनेच्या शाखेत काम करत राज्याचे पर्यटन मंत्री ते आता खासदारकीपर्यतच्या प्रवासात कीर्तीकरांनी पक्षवाढीसाठीही मोलाचे योगदान दिले.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikarsarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक, सरकारी नोकरीतील मराठी टक्का वाढावा म्हणून झटणारे कट्टर मराठी प्रेमी आणि आक्रमक हिंदुत्व विचासरणी अशी गजानन कीर्तीकरांची ओळख. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात 50 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव कीर्तीकरांना आहे. या कालखंडात त्यांनी राज्य आणि देशाच्या राजकारणातील अनेक घटना जवळून पाहिल्या आहेत. राज्यात मंत्री आणि लोकसभा सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिवसेनेच्या शाखेत काम करत राज्याचे पर्यटन मंत्री ते आता खासदारकीपर्यतच्या प्रवासात कीर्तीकरांनी पक्षवाढीसाठीही मोलाचे योगदान दिले. मात्र, कीर्तीकर ज्या शिवसेनेत घडले, वाढले, सत्ता उपभोगली त्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला कीर्तीकरांनीदेखील पक्षफुटीनंतर रामराम ठोकून शिंदे गटात सहभागी होत पक्षनिष्ठेऐवजी राजकारणाला प्राधान्य दिले.

कीर्तिकर हे सध्या उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, यापूर्वी त्यांनी मुलगा अमोल कीर्तिकर याला संधी मिळावी म्हणून आगामी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पण शिवसेना नेते रामदास कदम यांनीदेखील गजानन कीर्तीकर जर निवडणूक लढणार नसतील तर माझा मुलगा सिद्धेश कदम निवडणूक लढवेल, असे मत व्यक्त केले होते. त्यावर गजानन कीर्तीकरांनी आपण स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, या मतदारसंघातून पिता-पुत्र असलेल्या गजानन कीर्तीकर आणि अमोल कीर्तीकर या दोघांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

नाव (Name)

गजानन चंद्रकांत कीर्तीकर

जन्मतारीख (Birth date)

3 सप्टेंबर 1943

शिक्षण (Education)

पदवीधर (अर्थशास्त्र)

Gajanan Kirtikar
Mumbai North LokSabha Constituency : नगरसेवक ते खासदार बनलेल्या गोपाळ शेट्टींना उत्तर मुंबईतून हॅटट्रिकची संधी!

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

गजानन कीर्तीकराचे कुटुंब मुंबईत वास्तव्याला आहे. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी कारवारमध्ये झाला. गजानन कीर्तीकरांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत कीर्तीकर तर आईचे नाव रत्नप्रभा कीर्तीकर असे आहे. गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीचे नाव मेघना असे आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. पुत्र अमोल हे देखील राजकारणात सक्रिय असून, ते शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. अमोल हे देखील आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे, अमोल यांनी शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. गजानन कीर्तीकर हे राजकारणात येण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेत ‘कॉईन आणि नोट एक्झामिनर’ म्हणून नोकरीत होते.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

मुंबई उत्तर -पश्चिम

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेच्या शाखेपासून पक्षाचे काम सुरू केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठी भाषिकांसाठी कार्य करण्यासाठी कीर्तीकरांनी 1966 मध्ये सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ शिवसैनिक म्हणून काम सुरू केले होते. ते शिवसेनेचे एकनिष्ठ आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सुरुवातीपासूनच त्यांनी एकमेव शिवसेनेशीच आपली पक्षनिष्ठा कायम राखली होती. दरम्यान, 1990 मध्ये त्यांना पहिल्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली, त्यानंतर सलग चार टर्म त्यांनी मालाड मतदारसंघाचे आमदार झाले. आमदार म्हणून आक्रमक बाणा जपणाऱ्या कीर्तीकरांना पुढे मंत्रीपदाचीही संधी लाभली. त्यांनी गृह राज्यमंत्री, माहिती व प्रसारण मंत्री, पर्यटन, परिवहन मंत्री म्हणूनही काम पाहिले. या कालावधीत कीर्तीकरांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

पुढे 2014 मध्ये शिवसेनेने कीर्तीकरांना उत्तर -पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मोदी लाटेत युतीमध्ये लढणाऱ्या कीर्तीकरांचाही विजय झाला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार गुरुदास कामत यांचा पराभव केला होता. दरम्यान, 2019 मध्येही शिवसेनेने कीर्तीकरांवर विश्वास टाकत पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीतही ते विजयी झाले. त्यांना 5 लाख70 हजार 063 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना 3 लाख 9 हजार 735 मते मिळाली होती. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सुरेश शेट्टी यांना उमेदावरी दिली होती. त्यांना 23 हजार 422 मते मिळाली होती.

दरम्यान, 2022 मध्ये शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्ष फोडला. या फुटीनंतर शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कीर्तीकरांनीही पक्षाला रामराम ठोकला आणि शिंदेंच्या गटात सहभागी झाले. माझी शिवसेनेत घुसमट होत होती, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे म्हणूनच मी इतर पक्षात न जाता हिंदुत्ववादी विचारांच्या आक्रमक आणि मराठी माणासांच्या उत्कर्षाचा विचार करणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचे कारण दिले. मात्र, त्यांचा मुलगा अद्यापही ठाकरे गटात असल्याने किर्तिकरांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कीर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांनी त्यांच्याच गटातील नेते रामदास कदम यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता. दरम्यान, शिंदे गटातही भाजप आपल्या खासदारांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप कीर्तीकरांनी केला होता. अशा परिस्थितीतच आता त्यांना आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटातून लढवण्याचे जाहीर केले आहे. या राजकीय प्रवासात कीर्तीकरांनी 'शिवसेना लोकाधिकार आणि मी' हे पुस्तक देखील लिहिले.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

मराठी माणसांचा सरकारी नोकरीतील टक्का वाढवणे, मतदारांच्या समस्या सोडवणे याला कीर्तीकरांनी नेहमीच प्राधान्य दिले. आमदार, खासदार म्हणून काम करताना सामाजिक, धार्मिक कार्यात ते हिरीरीने सहभागी होत असत. शिवसेनेत काम करताना लोकाधिकार चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मराठी मतदारांचे अनेक महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी म्हणून मुंबईतील हार्बर लाइनच्या विस्तारीकरणातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणे, मुंबईतील रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, वर्सोवा खाडीतील गाळ उपसून मच्छीमारांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे यासारख्या कामांचा पाठपुरावा करून ती कामे तडीस लावण्याचे काम त्यांनी केले. याचबरोबर विमानामध्ये महिला प्रवाशांसाठी राखीव सीट उपलब्ध व्हाव्यात यासाठी देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत ती सुविधा उपलब्ध करून घेतली होती. कीर्तिकर हे नागरिकांच्या किरकोळ प्रश्नांसाठीही रस्त्यावरून उतरायचे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कीर्तिकर विजयी झाले होते.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

गजानन कीर्तीकरांसाठी 2019 ची लोकसभा निवडणूक दुसरी टर्म होती. त्यामुळे मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा त्यांना फायदा झाला. शिवाय उत्तर -पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे आणि तीन भाजपकडे होते. त्याचा कीर्तीकर यांना फायदा झाला. त्यातच या निवडणुकीत युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची संयुक्तपणे प्रचारयंत्रणा या मतदारसंघात कार्यरत असल्याने कीर्तीकरांचा विजय सुकर झाला.

दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघात संजय निरुपम यांना उमेदवारी दिली होती. निरुपम हे तुल्यबळ उमेदवार मानले जात नव्हते. त्यातच त्यांनी आपला उत्तर -मुंबई मतदारसंघ सोडून या मतदारसंघातून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे या ठिकाणी निरुपम यांना विकासकामांवर बोलण्यासारखे काही नव्हते. याउलट कीर्तीकरांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे मुंबईकरांशी ते जोडले गेले. त्यांना मतदारसंघात कोणत्या ठिकाणी विकास झाला आहे आणि कोणते प्रश्न प्रलंबित आहेत याची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीत प्रभावी रणनीती आखण्यात यश मिळाले.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

गजानन कीर्तीकर यांचा मतदारसंघातील जनसंपर्क अंत्यत प्रभावी आहे. ते लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक शिवसैनिक म्हणून मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. जवळपास 50 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांची मतदारांशी जोडलेली नाळ अधिक घट्ट आहे. शिवसेनेची शाखा, विधानसभा आणि नंतर लोकसभा मतदारसंघ असा त्याचा राजकीय प्रवास झाला असल्याने मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे पसरले आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

गजानन कीर्तीकर उच्चशिक्षित असून सोशल मीडियाच्या वापरात ते आघाडीवर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती ते शेअर करत असतात. शिवाय त्यांचे राजकीय विचार, मत-मतांतरे, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून शेअर करताना दिसून येतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

गजानन कीर्तीकर हे एक ज्य़ेष्ठ शिवसेना नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या शब्दाला पक्षात महत्व होते. त्यामुळे ते बोलताना सावध भूमिकेतूनच आपले मत व्यक्त करतात. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांनी भाजप-शिवसेना युती असतानाही मित्रपक्षावर टीका केली आहे. कीर्तीकरांनी मित्रपक्ष भाजप हा जनाधार असलेल्या नेत्यांना विकत घेतो, अशी टीका केली होती. शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दार म्हणून निशाणा साधला होता. शिंदे गटात सामील झाल्यानंतर खेड येथील सभेत बोलताना कीर्तीकरांनी उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेबांची शिवसेना संपवली, त्यामुळे उद्धव ठाकरेच खरे गद्दार असल्याची जहरी टीका केली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

गजानन कीर्तीकर हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विकासकामांच्या जोरावर त्यांना जनतेला सामोरे जाता येणार आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा मतदारसंघ शिंदे गटाला सुटल्यास शिंदे गटाकडून त्यांच्याच नावाचा विचार केला जाऊ शकतो. शिंदे गट एनडीएमध्ये सहभागी झाल्याने भाजपचीही ताकद त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकते. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली तर कीर्तिकरांना खासदारकीची तिसरी टर्म पूर्ण कण्याची संधी उपलब्ध होईल.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

राज्यातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये पडलेल्या फुटीचा येणाऱ्या निवडणुकीर निश्चितच परीणाम होणार आहे. गजानन कीर्तीकर यांच्यासाठी आगामी निवडणुकीची वाट खडतर असणार आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यापूर्वी कीर्तीकर हे अंखड शिवसेनेचे उमेदवार असायचे. मात्र त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना आगामी निवडणुकीत सामोरे जावे लागेल. तसेच हा मतदारसंघ पुन्हा शिंदे गटाला सुटेल की नाही याची शाश्वती नाही. सुटला तरी शिंदे गटातील अंतर्गत वादाचा फटका बसून त्यांना तिकीट मिळण्याची शाश्वती कमीच आहे.

रामदास कदम यांचा त्यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता आहे. कीर्तीकर यांचे पुत्र अमोल हे ठाकरे गटात आहेत आणि तेही याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यामुळे कीर्तीकरांच्या निष्ठेवर यापूर्वीच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उत्तर- पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.यापैकी तीन मतदारसंघांत रवींद्र वायकर ,ऋतुजा लटके आणि सुनील प्रभू हे तिन्ही ठाकरे गटाचे आमदार आहेत. उर्वरित तीन भाजपचे आहेत. भाजप देखील हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी तयारीत आहे. असे असताना खासदार कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत. या सर्व बाबी त्यांच्या अडचणीच्या ठरणार आहेत.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

गजानन कीर्तिकर हे 2014 आणि 2019 अशा दोन टर्म उत्तर -पश्चिम मुंबई मतदारसंघातून खासदार आहेत. आगामी निवडणूक लढवण्यास त्यांनी नकार दिला होता. शिवसेना नेते रामदास कदम यांनी कीर्तीकर लढणार नसतील तर माझा मुलगा सिद्धेश निवडणूक लढवेल, असे म्हटले होते. त्यानंतर गजानन कीर्तीकरांनी आपण स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामागे ठाकरे गटात असलेले पुत्र अमोल कीर्तीकर यांच्या विजयाची वाट सुकर होण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता.

त्यामुळे शिंदे गटाकडूनही आगामी काळात कीर्तीकर यांना उमेदवारी देताना ठाकरे गटातून कोणाला उमेदवारी दिली जाते याचा विचार करूनच पुढची पावले उचलली जातील. अशा परिस्थितीत कीर्तीकरांचे तिकीट कापल्यास ते मुलगा अमोल यांना शिंदे गटातून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे, ठाकरे गटातून अमोल कीर्तीकर यांना तिकीट मिळाल्यास गजानन कीर्तीकर पुन्हा ठाकरे गटाकडे परतण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र राजकारणात जर तरला काही महत्व उरत नाही. त्यामुळे आगामी काळात कीर्तिकर कोणता निर्णय घेतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Gajanan Kirtikar
BJP Politics : भाजपला सत्ता मिळवून देणाऱ्या ‘लाडली बहना’लाच सासुरवास; धक्कादायक माहिती समोर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com