

BMC Swachh Mumbai awareness scheme controversy : मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या 'स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान' (वस्ती स्वच्छता योजना) विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
योजना अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरल्याचा दावा करत भाजपने तिचा फेरआढावा घेऊन ती बंद करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच, योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
भाजपचे (BJP) सभागृह नेते गणेश खणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "स्वच्छता मनापासून शहरापर्यंत" या घोषवाक्यासह सुरू करण्यात आलेल्या योजनेत प्रत्यक्षात केवळ 40 टक्के काम झाले, तर 60 टक्के निधी भ्रष्टाचारात गेला. दरवर्षी 80 कोटी रुपयांहून अधिक खर्च होऊनही मुंबईच्या स्वच्छतेत अपेक्षित सुधारणा झालेली नाही, असा त्यांचा दावा आहे.
गणेश खणकर यांच्या मते, 2013 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत वस्त्यांचे वाटप करण्यासाठी वापरण्यात आलेली सोडत पद्धत आणि कम्युनिटी पूल प्रणाली पारदर्शक नव्हती. शिवसेना ठाकरे पक्षाशी (ShivsenaUBT) संबंधित संस्था किंवा मर्जीतील संघटनांना वस्त्यांचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी कागदोपत्री संस्था दाखवून निधी वळविण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला.
योजनेच्या देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेली स्वच्छता प्रबोधन सल्लागार समिती देखील प्रभावी ठरली नसल्याचा दावा भाजपने केला आहे. मुंबई महापालिकेवर सध्या महायुतीचे वर्चस्व असल्याने या संपूर्ण योजनेचा फेरआढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे संकेतही देण्यात आले.
भाजपच्या आरोपानुसार, स्वच्छता साहित्य आणि जनजागृतीसाठी संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला; मात्र बोगस स्वयंसेवक दाखवून निधीचा गैरवापर झाला. अनेक वस्त्यांमध्ये स्वच्छतेची स्थिती सुधारली नसतानाही संबंधित संस्थांवर दंडात्मक कारवाई झाली नाही. विशेष कामगिरी नसतानाही काही शेजार समित्या आणि 'वस्ती मित्र' यांना पुरस्कार देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.
गणेश खणकर यांनी दावा केला की, अनेक ठिकाणी निधीचा अपव्यय झाला असून प्रत्यक्षात काम झाले नाही. "स्वच्छ अभियान हे महापालिकेची तिजोरी साफ करण्याचे साधन बनले असून केवळ कंत्राटदारांचे हित जोपासले गेले. त्यामुळे ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला जाईल," असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अलीकडेच मुंबईतील मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, झाडे कोसळणे, चेंबरमध्ये पडण्याच्या घटना आणि इतर दुर्घटनांमुळे महापालिकेच्या कारभारावर टीका झाली होती. या दुर्घटनांच्या चौकशी अहवालावरूनही राजकीय वाद सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीका करत, जनहितापेक्षा आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे स्वच्छता योजनेवरील भाजपच्या भूमिकेकडेही राजकीय घडामोडींच्या संदर्भात पाहिले जात आहे. योजना कायम ठेवायची की बंद करायची, याबरोबरच मुंबईची स्वच्छता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी महापालिका पुढे कोणत्या उपाययोजना करणार, याकडेही लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.