

Mumbai Politics Updates : ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जागा वाटप फायनल होत आलं आहे. यानंतर युती जाहीर होईल, असे दोन्हीकडील नेते सांगत आहेत. परंतु महाविकास आघाडीवर ठाकरे बंधूंच्या या युतीचा परिणाम दिसू लागले आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबई महापालिकेत वेगळी वाट निवडीची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबरोबर हातमिळवणीची तयारी सुरू केल्याचे दिसते. तशी मुंबईत दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये पहिली बैठक झाल्याचे समोर आलं आहे.
महापालिकेच्या आगामी रणधुमाळीत मुंबईत आता मोठे फेरबदल दिसू लागले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने (MNS) म्हणजेच ठाकरे बंधूंनी मुंबईत एकत्र लढण्याचे संकेत दिलेत. यामुळे महाविकास आघाडीत मोठी दरी निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने ठाकरे बंधूंच्या युतीपासून वेगळी राहण्याची भूमिका घेतली आहे.
मुंबईचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत, काँग्रेस अन् वंचितमध्ये महापालिका निवडणुकीत आघाडीच्या प्रस्तावाची चर्चा केली आहे. यामुळे मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धर्मनिरपेक्ष मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न याद्वारे होत आहे. ठाकरे आणि मनसे एकत्र आल्याने काँग्रेसने आता धर्मनिरपेक्ष आणि दलित-वंचितांच्या मतांवर काँग्रेसने लक्ष केंद्रित केलं आहे. काँग्रेस स्वबळावर लढणार असली, तरी वंचित बहुजन आघाडीसारख्या समविचारी पक्षांशी जागावाटपाची चर्चा करून महायुती आणि ठाकरे-मनसे जोडीसमोर तगडे आव्हान उभे करण्याची काँग्रेसची व्यूहरचना आहे.
या भेटीत केवळ जागा वाटपावरच नाही, तर मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचारासह स्थानिक प्रश्नांना हात घालण्याच्या मुद्द्यांवर ही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि मनसे एकत्र आल्याने, मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी काँग्रेसने मुंबईतील आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांशी संधान साधले.
‘आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन विकास आणि सर्वसमावेशकतेच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवू,’ असे सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केले. मुंबईत काँग्रेसला डावलून ठाकरे बंधू एकत्र आल्याने काँग्रेसने ‘वंचित’चा हात धरून आपली ताकद दाखवण्याची तयारी केल्याने ही निवडणूक आता केवळ सत्तेसाठी नव्हे, तर अस्तित्वाची लढाई बनली आहे.
महायुती म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांची महायुती, ठाकरे आघाडी म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी आणि तिसरी काँग्रेस-वंचित आघाडी, अशी मुंबईत तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.