
Mumbai, 09 December : निवडणूक घेण्याचा अधिकार संविधानाने निवडणूक आयोगाला दिलेला आहे, तो सामान्य जनतेला नाही. मारकडवाडीबद्दल आम्हालाही आपलेपणा, प्रेम, जिव्हाळा आहे. पण, कारण नसताना बाऊ केला जात आहे. कधी तरी लक्षात घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे. आपल्याला जनतेने नाकारले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं तेव्हा विरोधकांना गारगार वाटत होतं, अशी टोलेबाजीही दादांनी केली.
ॲड. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना चिमटे काढत जोरदार टोल लगावले. ते म्हणाले, निवडणुकीच्या काळात अनेक जण संविधान हातात घ्यायचे. संविधान हातात घेतले म्हणजे आदर वाटतो आणि जे घेत नाहीत त्यांना संविधानाबद्दल आदर नसतो असे आहे का?
संविधानाच्या तरतुदीनुसार संबंधित सदस्यांनी आसन ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणे आवश्यक आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे तरतुदींचा भंग आहे. मला विरोधकांच्या बहिष्कारबाबत विचारण्यात आले, त्या वेळी ‘आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर यांनी शपथ घेतली नाही तर त्यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्या गपगुमान शपथ घेतील, काही काळजी करू नका. जरा काळ काढा,’ असे मी माध्यमांसमोर बोलताना म्हटले होते. कळ काढली आणि विरोधकांनी शपथा घेतल्या, असा चिमटाही त्यांनी विरोधी आमदारांना घेतला.
अजित पवार म्हणाले, एखाद्या सदस्याच्या निवडीला आव्हान द्यायचे असेल तर इलेक्शन पिटीशन दाखल करून द्यावं लागतं. संविधानातील तरतुदींचा वापर करावा लागतो. नाही तर उगीच काही तरी स्टंटबाजी करायची. मारकडवाडी ग्रामस्थांबद्दल आम्हालाही आपेलपणा, प्रेम, जिव्हाळा आहे. पण कारण नसताना बाऊ केला जात आहे.
आकडे काढायचे म्हटले तर ४८ टक्के महायुतीला, तर ३३ टक्के महाविकास आघाडीला मते आहेत. एवढा फरक असल्यानंतर दारूण पराभव होणार, हे निश्चित आहे. तरीही काही ना काही आकडे काढले जातात. मतदानाच्या आकडेवारीबाबत मी जास्त काही बोलणार नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्याबाबत मी सविस्तर बोलेन.
काहींनी सांगितले की इतकी मतं मिळाली आणि इतके निवडून आले. त्यांनी इतकी मते मिळाली आणि इतके निवडून आले, हे सर्व मी नागपूरमध्ये मांडणार आहे. सभागृहात आणि सभागृहाच्या माध्यमातून जनतेलाही दाखवेन, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.
आमची बाजू खरी आहे, त्यात कोठेही खोटं नाही. लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२. च्या वर काही तरी टक्के मते होती, तर आघाडीला ४३ टक्के मते होती. आघाडी आणि महायुतीमध्ये फक्त पाईंट सहा टक्क्यांचा फरक होता. तरीही आमच्या जागा १७ आणि त्यांच्या जागा ३१ आल्या. तेव्हा आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे जनतेचा कौल आहे, असे समजून लढत राहिलो. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं. तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगल वाटायचं. आता गारगार वाटतं की गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा, असा सल्लाही अजित पवारांनी विरोधकांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.