

Raju Patil News : डोंबिवलीत मनसे पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रवेश कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी “सर्व मित्र येत आहेत, लवकरच मोठा मित्रही येईल,” असे सूचक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले. नाव न घेता करण्यात आलेल्या या विधानाचा रोख मनसे नेते राजू पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले. “1995 पासून रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत. त्यांच्या अनेक मित्रांचे आयुष्य पुढे गेले, काहींचा एन्काऊंटरही झाला. ते नक्की कोणत्या मित्रांबद्दल बोलले हे मला माहीत नाही. जर त्याचा संदर्भ माझ्याशी जोडला जात असेल, तर जेव्हा ते माझे नाव घेऊन बोलतील, तेव्हाच मी त्यांना उत्तर देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपवर टीका करताना राजू पाटील म्हणाले, “लोकांना कन्फ्युज करून कंट्रोल करण्याची भाजपची एक पद्धत आहे. मात्र माझी पक्षनिष्ठा कोणतीही मैत्री, पैसा किंवा दमबाजी विकत घेऊ शकत नाही.”
डोंबिवलीतील अलीकडील राजकीय गदारोळावर भाष्य करताना त्यांनी गंभीर आरोपही केले. “डोंबिवलीत पैसे वाटप करताना लोकांनी काही जणांना पकडले. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचालींमुळे वाद आणि मारामारी झाली. ही डोंबिवलीची संस्कृती आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या घटनांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राजू पाटील यांनी नागरिकांना रस्त्यावर उतरून जाब विचारण्याचे आवाहन केले. त्यांच्या या भूमिकेमुळे डोंबिवलीतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.